रेल्वेस्थानकावर होतेय गर्दी : मात्र पुरामुळे रेल्वेची गती मंदावली
प्रतिनिधी /बेळगाव
महापूर व दरड कोसळल्यामुळे दोन दिवस बंद असलेली रेल्वे रविवारपासून पुन्हा पूर्ववत सुरू झाली. रेल्वे सुरू होताच मुंबई, बेंगळूर यासह इतर शहरांना जाण्यासाठी प्रवाशांनी सोमवारी रेल्वेस्थानकावर गर्दी केली होती. राष्ट्रीय महामार्ग बंद असल्याने प्रवाशांनी रेल्वेने प्रवास करणे पसंत केल्याने बऱयाच दिवसांनी प्रवाशांनी रेल्वेस्थानक फुलल्याचे चित्र दिसले.
नैर्त्रुत्य रेल्वेच्या अखत्यारीत येणाऱया दूधसागरनजीक शुक्रवारी पहाटे दरड कोसळली. यामुळे वास्को-बेळगाव वाहतूक ठप्प झाली. पाच्छापूर व अळणावरजवळ नदीचे पाणी रेल्वेरुळाच्या बाजूने वाहत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे बंद ठेवण्यात आल्या होत्या. यामुळे बेळगावचा हुबळी व मिरजशी संपर्क तुटला होता. एक्स्प्रेस रेल्वे इतर मार्गांनी वळविण्यात आल्याने प्रवाशांना मोठा फटका बसला. अनेकजण रस्त्यामध्येच अडकून पडले होते. रविवारपासून रेल्वे सुरू झाली असली तरी सोमवारपासून पूर्ण क्षमतेने रेल्वे वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
रेल्वे उशिराने दाखल
दूधसागरनजीक दरड कोसळली, पाच्छापूर व अळणावरजवळ पुराचे पाणी रेल्वेरुळावर आल्याने रेल्वे वाहतूक ठप्प होती. परंतु या समस्या शनिवारी रात्रीपर्यंत दूर करण्यात आल्याने रविवारी दुपारपासून सुरळीत वाहतूक सुरू झाली. परंतु अद्यापही पुराचे पाणी पूर्णपणे ओसरले नसल्याने रेल्वेची गती मंदावली आहे. रेल्वे उशिराने पोहोचत असल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत होती.
महामार्ग बंद, रेल्वेला पसंती
निपाणीनजीक राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्याने तो वाहतुकीसाठी बंद आहे. सोमवारी केवळ अत्यावश्यक सेवेसाठी सुरू करण्यात आल्याने नागरिकांनी रेल्वेने प्रवास करणे पसंत केले. त्यामुळे रेल्वेस्थानकाच्या काऊंटर तसेच ऑनलाईनद्वारे रेल्वेचे तिकीट बुकिंग करण्यात येत होते. सोमवारी बेंगळूर-बेळगाव, बेंगळूर-मिरज, म्हैसूर-बेळगाव, तिरुपती-कोल्हापूर, हुबळी-दादर, वास्को-निजामुद्दीन, बेंगळूर- जोधपूर, तिरुवेनवेल्ली-दादर या रेल्वे धावल्या.