प्राणवायूची वाहतूक वेगवान आणि मोठय़ा प्रमाणात करण्याची तयारी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सध्याच्या कोरोना उद्रेकाच्या काळात देशभरात द्रवरूप प्राणवायूचा (लिक्विड ऑक्सिजन) तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे विविध राज्यांना प्राणवायूचा पुरवठा करण्यासाठी रेल्वेने ‘ऑक्सिजन एक्स्पेस’ चालविण्याची योजना आखली आहे. येत्या काही दिवसांमध्ये ही योजना लागू होईल.
मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या सरकारांनी केंद सरकारकडे द्रवरूप प्राणावायूची मागणी केली आहे. या दोन राज्यांसह अनेक राज्यांमध्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये द्रवरूप प्राणवायूची मागणी मोठय़ा प्रमाणात वाढली असून ती भागविण्यासाठी रेल्वे सज्ज आहे. त्यामुळे द्रवरूप प्राणवायूचे टँकर्स रेल्वेने घेऊन जाण्यासाठी सर्व सज्जता करण्यात येत आहे. या वाहतुकीची तांत्रिक व्यवहार्यता चाचपण्यात येत असून तज्ञांनी मान्यता दिल्यानंतर त्वरित अशा गाडय़ा सोडल्या जाऊ शकतात. त्यामुळे प्राणवायूची वाहतूक वेगवान आणि मोठय़ा प्रमाणात केली जाऊ शकेल. प्रतिदिन देशाला 2 हजार टन द्रवरूप प्राणवायूची आवश्यकता पडणार आहे. ती भागविण्याचे आव्हान सरकार आणि रेल्वेने स्वीकारले आहे.
देशाच्या काही भागांमध्ये ही वाहतूक रस्त्यावरून करणे अशक्य आहे. कारण प्राणवायूचे टँकर्स उंच असतात. अनेक ठिकाणी रस्ते किंवा उड्डाण पुलांवरून उंच आणि अवजड वाहने नेण्यास अनुमती नसते. त्यामुळे रेल्वेने ही वाहतूक करण्याची शक्यता पडताळली जात आहे, अशी माहिती देण्यात आली.
चाचणी महाराष्ट्रात
रेल्वेने प्राणवायू वाहतूक करण्याची योजना कशाप्रकारे लागू करण्यात येईल याची चाचणी महाराष्ट्रात होणार आहे. महाराष्ट्र विभागाच्या वाहतूक आयुक्तांच्या देखरेखीत ही चाचणी कळंबोली-बोईसर येथून होणार आहे. या रेल्वेस्थानकावरून रिकामे प्राणवायू टँकर्स जमशेदपूर, रुरकेला आणि बोकारो येथे पाठविण्यात येतील. तेथे द्रवरूप प्राणवायू भरून घेऊन हे टँकर्स परत मुंबईत येणार आहेत. चाचणी यशस्वी झाल्यानंतर सर्व राज्यांना अशाप्रकारे पुरवठा केला जाणार आहे.