ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
यूव्हीसी (अतिनील किरण) प्रकाशकिरणांचा विशिष्ट पद्धतीने सातत्याने मारा सुरू ठेवल्यास कोणताही विषाणू निष्क्रीय होऊ शकतो. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने आपल्या विमानांमध्ये यूव्हीसी यंत्रणा बसवली आहे. आता भारतीय रेल्वेनेही प्रायोगिक तत्वावर ‘आयसीएमआर’ प्रमाणित यूव्हीसी यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वे सुरूवातीला लखनऊ-दिल्ली शताब्दी एक्सप्रेसच्या सर्व डब्यांमध्ये यूव्हीसी यंत्रणा बसवणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास टप्प्याटप्प्याने लांब पल्ल्याच्या रेल्वेमध्ये ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. यूव्हीसी तंत्रज्ञानाने डबे स्वच्छ आणि किटाणूरहित केले जाऊ शकतात. हे तंत्रज्ञान सुरक्षित असून, त्याचा माणसाला कोणताही अपाय होत नाही. ते रिकाम्या ट्रेनमध्ये रिमोटद्वारे ऑपरेट केले जाते. देशात तिसऱ्या लाटेचा धोका असल्याने रेल्वे आपल्या परीने तयारी करत आहे.