काही स्थानकांवर काही काळ बंद, वाहतूक सुरळीत असल्याचा प्रशासनाचा दावा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्र सरकारने नुकतेच केलेले कृषी कायदे मागे घ्यावेत, या मागणीसाठी चाललेल्या आंदोलनाचा भाग म्हणून पुकारण्यात आलेल्या ‘रेल रोको’ आंदोलनाला देशभरात संमिश्र ते अल्प प्रतिसाद मिळाला आहे. काही भागांमध्ये काही काळ रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. मात्र, बव्हंशी रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू होती, असे दिसून आले आहे. हा रेल रोको गुरुवारी दुपारी 12 ते 4 या काळात होता.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने सुरक्षा व्यवस्था कडोकोट केली होती. रेल्वे विभागाच्या मुख्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला होता. तसेच विभागीय कार्यालयांकडूनही परिस्थितीवर लक्ष दिले जात होते. पंजाब व हरियाणा या दोन राज्यांमध्ये काही ठिकाणी शेतकऱयांनी रेल्वे मार्गांवर आडवे पडून काहीकाळ गाडय़ांची वाहतून रोखली. मात्र इतर राज्यांमध्ये प्रतिसाद अल्प होता, अशी माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे.
शांततेत पार
हे आंदोलन अतिशय शांततेत पार पडले, अशी माहिती किसान आंदोलन समितीने दिली. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, अशा स्पष्ट सूचना आंदोलकांना देण्यात आल्या होत्या, असे भारतीय किसान संघटनेनेही स्पष्ट केले. आंदोलकांनी नेत्यांच्या आदेशांचे तंतोतंत पालन केल्याचे दिसून आले.
पश्चिम उत्तर प्रदेशात प्रतिसाद
या आंदोलनाला पश्चिम उत्तर प्रदेशात काहीसा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. काही रेल्वे स्थानकांवरच शेतकऱयांनी ठाण मांडले होते. त्यामुळे त्या स्थानकांमधून आंदोलनकाळात गाडय़ा पुढे जाऊ शकल्या नाहीत. मात्र पोलिसांनी त्वरित कृती करून अनेक स्थानांवर आंदोलकांना दूर केले. परिणामी फारसा अडथळा न होता रेल्वे वाहतूक विनाअडथळा सुरू होती.
रेल्वे विभागाचा दावा
रेल रोको शांततेत पार पडला असा दावा रेल्वे सुरक्षा दलाचे प्रमुख अरूण कुमार यांनी केला. आवश्यकता भासल्यास परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अर्धसैनिक दालांच्या काही तुकडय़ांना सज्ज राहण्यास सांगण्यात आले होते. रेल्वे मार्गांवर सुरक्षा वाढविण्यात आली होती. आंदोलन शांततेत पार पडल्याने नंतर अधिकाऱयांनीं सुटकेचा निःश्वास टाकला, असे सांगण्यात आले.
विविध राज्यांमधील स्थिती
आसाम, पश्चिम बंगाल, बिहार, ओरीसा या पूर्वेकडील राज्यांमध्ये हे आंदोलन काही प्रमाणात झाले. कोलकाता रेल्वे स्थानकामध्ये काही गाडय़ा थांबविण्यात आल्या होत्या. तथापि, त्यांना फार काळ खोळंबून रहावे लागले नाही, असे सांगण्यात आले. बिहारमध्ये काही रेल्वे मार्गांवर साधारणतः दोन तास वाहतूक आडविण्यात शेतकऱयांना यश आले होत. तथापि, एकंदर स्थिती पाहता मोजकी ठिकाणे वगळता या आंदोलनाला प्रतिसाद नव्हता, असेही स्पष्ट झाले.
शेतकऱयांची संख्या कमी
रेल्वे आडविण्यासाठी काही शेतकऱयांनी दुपारी 12 ते 4 या काळात तुरळक रेल्वेमार्गांवर धरणे दिले होते. त्यामुळे काही आंतरराज्य गाडय़ांच्या वेळापत्रकात आयत्या वेळी बदल करण्यात आला. तसेच काही ठिकाणी वाहतूक अन्य मार्गांवरून वळविण्यात आली होती असे सांगण्यात आले. रेल्वे आडविणाऱया शेतकऱयांची संख्या लक्षणीय नव्हती, असेही सांगण्यात आले.
पश्चिम बंगालमध्ये बैठक
आंदोलक शेतकऱयांचे नेते पश्चिम बंगालमध्ये बैठक घेणार आहेत. तसा ठराव गुरूवारी करण्यात आला. या राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. शेतकऱयांचे जीवन उद्ध्वस्त करणारे कायदे करणाऱया पक्षाला निवडून देऊ नका, असे आवाहन भारतीय किसान संघटनेचे नेते राकेश टिकैत यांनी केले. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या वेळी देशभरातून ट्रक्टर्ससह लक्षावधी शेतकऱयांना येण्यास सांगितले जाईल. अभिनव मार्गाने आंदोलन होईल असे प्रतिपादन त्यांनी केले.