प्रतिनिधी / कोल्हापूर
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील अंत्योदय व प्राधान्य शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थ्यांचे आधार सिर्डींग 100 टक्के पूर्ण करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना आहेत. 23 ऑक्टोबर पूर्वी प्रत्येक लाभार्थी रेशनकार्डवरील सर्व व्यक्तिंचे 100 टक्के आधार सिडींग आणि प्रत्येक शिधापत्रिकेसाठी किमान एक वैध मोबाइल क्रमांक लिंक करण्यात येणार आहे. नियमित धान्य मिळणाऱया अन्नसुरक्षा योजनेतील अंत्योदय व प्राधान्य गटातील लाभार्थ्यांनी धान्याचे मासिक वाटप करतेवेळी ई-पॉस उपकरणाव्दारे आपल्या शिधापत्रिकेतील ज्या व्यक्तींचे आधार क्रमांकाचे सिडींग करण्यात आले नाही. त्यांनी रास्तभाव दुकानदाराकडे आधार कार्ड घेऊन जावे आणि सिडींग पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी केले आहे.
सिडींग होईपर्यंत संबंधित व्यक्तीला धान्य मिळणार नाही
रास्तभाव दुकानांतील ई-पॉस उपकरणांमधील e-KYC व मोबाईल सिडींग सुविधेचा अधिकतम वापर करून आधार व मोबाईल क्रमांक सिडींगचे कामकाज पूर्ण करण्यात येणार आहे. आधार सिडींग करण्यात काही अडचणी येत असतील तर संबंधित तहसिल कार्यालयातील पुरवठा शाखेशी संपर्क साधावा. 23 ऑक्टोबर 2021 पर्यंत आधार सिडींग न झालेल्या व्यक्तिंचे अनुज्ञेय धान्य माहे नोव्हेंबर 2021 या महिन्यापासून आधार सिडींग होईपर्यंत निलंबित करण्यात येणार आहे.