ऑगस्टमध्ये केवळ 70 टक्केच ई-केवायसीचे काम पूर्ण
प्रतिनिधी /बेळगाव
अन्न व नागरी पुरवठा खात्यातर्फे दि. 1 ते 10 ऑगस्टदरम्यान ई-केवायसीचे काम केवळ 70 टक्केच पूर्ण झाले. अद्याप बऱयाच कार्डधारकांच्या हाताचे ठसे घेण्याचे काम शिल्लक असल्याने खात्याने मुदत वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे. दि. 1 ते 10 सप्टेंबरदरम्यान ई-केवायसीचे काम चालणार आहे.
ई-केवायसी न केलेल्या रेशनकार्डधारकांचे रेशन बंद करण्याचा इशारा खात्याने दिला होता. दरम्यान मुदत वाढवून दिल्याने कार्डधारकांना ई-केवायसी करून घेता येणार आहे. रेशनकार्ड लाभार्थ्यांनी अंगठय़ांचे ठसे न दिल्यास रेशनवरील तांदूळ व गहू बंद करण्याचा निर्णय खात्याने घेतला होता. ऑगस्ट महिन्यातील 10 दिवसांत ई-केवायसीचे काम पूर्ण न झाल्याने दि. 1 ते 10 सप्टेंबर दरम्यान ई-केवायसीचे काम हाती घेण्यात येणार आहे. रेशनकार्डधारकांनी संबंधित रेशनदुकानात जाऊन ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा खात्याने केले आहे.
रेशन वितरण दुकानातून शिधापत्रिकेवरील कुटुंबातील सर्व सदस्यांच्या (बायोमेट्रिक ठसे) बोटांचे ठसे घेण्यात आले. मात्र काही दुकानात सर्व्हरडाऊन व इतर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने कामात अडथळा निर्माण झाला. दरम्यान अद्यापही बऱयाच रेशनकार्डधारकांचे ई-केवायसीचे काम शिल्लक राहिले आहे. त्यामुळे शासनाने पुन्हा सप्टेंबर महिन्यात ई-केवायसी करून घेण्याच्या सूचना रेशन दुकानदारांना दिल्या आहेत. त्यामुळे रेशन दुकानदारांना परत सप्टेंबर महिन्यात ई-केवायसीचे काम हाती घ्यावे लागणार आहे. मागील दोन वर्षात ज्यांची ई-केवायसी झाली आहे त्यांना यावेळी वगळण्यात येणार आहे. रेशनकार्डमध्ये नावे असलेल्या सदस्यांना बोटांचे ठसे देणे बंधनकारक आहे. त्यामुळे रेशनकार्डधारकांनी फेरनोंदणी प्रकियेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन खात्याने केले आहे.