बदल्यात आपल्याकडील किराणा माल चढय़ा दराने विक्री करत असल्याचे निदर्शनास
वार्ताहर / उचगाव
कोरोना काळात राज्य आणि केंद्र सरकारकडून मोफत मिळालेल्या रेशनची कमी दराने नागरिकांकडून खरेदी करून आपल्याकडील किराणा माल जादा दराने विकणाऱया अवलियाने सुळगा (हिं.) परिसरात सपाटाच सुरू केल्याचे निदर्शनास येत आहे. रेशन देण्यासाठी नागरिक टेम्पोजवळ गर्दी करत असतात. फुकटात मिळालेल्या रेशनला जनतेने फुकटचाच भाव दिल्याची चर्चा सुळगेसह परिसरात ऐकावयास मिळत आहे.
घटनेची अधिक माहिती अशी, की कोरोना काळात देशातील जनता उपाशी राहू नये, लॉकडाऊनमुळे धंदे, व्यवसाय बंद पडले, रोजगार नाही, परिणामी हातात पैसा कमी झाला. जनतेवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी शासनामार्फत मोफत रेशन तांदूळ देण्यात येत होता. एखाद्याच्या घरी पाच-सहा व्यक्ती असल्यास गेल्या नऊ महिन्यांच्या कालावधीत तांदळाचा मोठा साठा झाला असल्याचे बोलले जात आहे. गेल्या चार-पाच दिवसांमध्ये दड्डी येथील एक इसम गावात टेम्पो भरून किराणा माल आणतो आणि गावातील नागरिकांकडील रेशनचा तांदूळ अगदीच कमी भावाने घेऊन आपल्याकडील किराणा माल जादा दराने देतो. यामध्ये या अवलियाचा चांगला फायदा आहे. रेशनचा तांदूळ चांगला मिळतो व दुसरीकडे आपल्या मालाची विक्री होऊन पैसाही बक्कळ मिळतो. नागरिकांना मिळणारा रेशनचा तांदूळ आणि त्या बदल्यात जादा दराने मिळणारा किराणा माल यामुळे ग्रामस्थही खुष आहेत.
सदर घटनेबाबत गावातील नागरिकांनी या अवलियाबाबत आक्षेप घेतला. मात्र, त्याने न घाबरता आपला व्यवसाय सुरूच ठेवला आहे. सदर घटनेची तक्रार गावकऱयांनी अन्नपुरवठा खात्याकडे फोनद्वारे केली असल्याचे कळते.