प्रतिनिधी / सातारा
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यात लॉक डाऊनच्या काळात कोणाला धान्याचा तुटवडा भासू नये या करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्या गेलेल्या घोषणेनुसार वाटप करण्याचे आदेश दिले गेले.मात्र, जिल्हाधिकारी असो वा अन्य कोणी आमचा नियम आम्हीच पाळणार ? आमच्या मनाप्रमाणे धान्य वाटणार असा हेका सातारा शहरातल्या काही दुकानदारांनी सुरू केला आहे. त्यामुळे ज्यांची केशरी कार्ड, दारिद्र्य रेषेखालील कार्ड आहेत.तेच लाभ धारक वंचित राहू लागली आहेत. सदरबझार येथील रेशन दुकानदाराने सुरू केलेल्या मनमानीची तक्रार सातारा तहसील कार्यालयात नागरिकांनी केली आहे.
लॉक डाऊनमुळे अनेकांच्या घरातील धान्य संपले आहे. त्यांना रेशन पुरवठा करावा अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी परिपत्रक काढले. त्यानुसार जिल्ह्यातील रेशन दुकानदारांनी वाटप सुरू केले. मात्र काही दुकानदारांनी मनमानी सुरू केली आहे. नियमानुसार वाटप न करता आपल्या ओळखीच्या लाभार्थीना धान्य देत आहेत. तसेच मोफत धान्य वाटप करण्याच्या सूचनेला ही हरताळ फासला जात आहे. सदरबझार येथील दुकानदाराने रेशनकार्ड असून त्यांना धान्य दिले जात नाही. अशी तक्रार तहसीलदार आशा होळकर यांच्याकडे करण्यात आली आहे.तसेच मंगळवार पेठेतील एका दुकानदाराने केशरी कार्ड धारकांना तुमचे धान्य आले नाही म्हणून परत पाठवल्याचे नागरिकांनी सांगितले.
सातारा तहसीलमधील पुरवठा विभागात स्वच्छता करावी
सातारा तहसील कार्यलयात काही कर्मचारी एवढे निर्ढावलेले आहेत.वरून एक आणि आतून वेगळेच वर्तन असून जो चुकीचे काम करेल त्याला पाठीशी घातले जाते.गोरगरीब लाभार्थीकडून पैसे घेऊन ही त्यांची कामे केली जात नाहीत.त्याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रारी झाल्या आहेत.पुरवठा विभागात अनेक वर्षे काम केल्याने कुठं माप मारायचं आणि कुठं झोल करायचा हे या कर्मचाऱ्यांना चांगलं माहिती आहे.
जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी ऍक्टिव्ह व्हावे
सातारा जिल्हाधिकारी कार्यलयात अनेक विभाग अजून ही तसेच रटाळपणे काम करताना दिसत आहेत.जिल्हाधिकारी अश्विन मुदगल असताना जिल्हा पुरवठा विभागाचे कामकाज चांगले चालले होते.मात्र, सध्याच्या जिल्हा पुरवठा अधिकारी या दुसर्याच्याच ओंजळीने पाणी पिण्यास माहीर असल्याची जोरदार चर्चा आहे.