कामगार खात्याच्या असंघटित कामगारांना रेशन किट वितरित करताना सामाजिक अंतर राखण्याकडे दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
कामगार खात्याच्या असंघटित कामगारांना रेशन वितरित करण्यात येत आहे. याकरिता ठिकठिकाणी मोठय़ा प्रमाणात गर्दी होत आहे. सामाजिक अंतर राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पण सामाजिक अंतर राखण्याचे भान नागरिकांना राहिले नसल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे रेशन किट महत्त्वाचे की जीव, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
कोरोनाच्या प्रसारामुळे लॉकडाऊन करण्यात आले. परिणामी असंख्य कामगारांचे हात थांबले, त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. पण सध्या अनलॉक झाल्यानंतर राज्य शासनाने असंघटित कामगारांसाठी आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. कामगार खात्यातर्फे असंघटित कामगारवर्गाला रेशन किटचे वितरण करण्यात येत आहे. याकरिता शेकडो कामगारांनी नोंदणी केली असून कामगार खात्यातर्फे मंगळवारी ठिकठिकाणी रेशन किट वितरित करण्यासाठी बोलाविण्यात आले होते. त्यामुळे कुली, बांधकाम तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱया कामगारांची गर्दी ठिकठिकाणी झाली होती. दररोजचे काम सोडून रेशन किट घेण्यासाठी कामगार दाखल झाले होते. पण यामध्ये खरे व खोटे कामगार किती? असा मुद्दा उपस्थित झाला होता.
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून तिसऱया लाटेचा संशय निर्माण झाला आहे. त्यामुळे लस घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मास्क लावणे व सामाजिक अंतर राखण्याचे आवाहन आरोग्य खात्याने केले आहे. पण रेशन किट घेण्यासाठी आलेल्या कामगारांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. गर्दी पाहता कोरोना संपला का, असा प्रश्न उपस्थित झाला होता. रेशन किट घेण्यासाठी आलेल्यांमध्ये महिलांचाही समावेश मोठय़ा प्रमाणात होता. काही महिलांच्या तोंडावर मास्क नव्हते. सामाजिक अंतर राखण्याच्या आवाहनाला हरताळ फासण्यात आल्याचे दिसून आले.