नागरी पुरवठामंत्री रवी नाईक यांचा इशारा : सर्व गोदामातून मागविला तपासणी अहवाल
प्रतिनिधी /फोंडा
क्राईम ब्रँचने काल मंगळवारी राज्यातील ज्या काही खासगी गोदामांवर छापे टाकून तांदुळ व गहू जप्त केला, त्याबद्दल आम्हाला माहिती नाही. मात्र नागरी पुरवठा खात्याच्या राज्यभरातील सर्व गोदामांतून तातडीने अहवाल मागवून धान्य साठय़ाची चौकशी करण्याचा आदेश खात्याचे संचालक गोपाळ पार्सेकर यांना दिला आहे, अशी माहिती नागरी पुरवठामंत्री रवी नाईक यांनी फोंडा येथे पत्रकार परिषदेत दिली.
रेशन धान्याचा काळाबाजार करणाऱयांची गय केली जाणार नाही. अशा गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दक्षिण व उत्तर गोव्यात खात्याअंतर्गत भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत, असे त्यांनी सांगितले. यावेळी नागरी पुरवठा खात्याचे संचालक गोपाळ पार्सेकर व कृषी खात्याचे ओएसडी मंदार शिरोडकर उपस्थित होते.
केपेत निरीक्षक, उपनिरीक्षक निलंबित
गेल्या आठवडय़ात केपे येथे धान्याच्या गोदामावर कारवाई करून नागरी पुरवठा खात्यातील एक निरीक्षक व उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. सध्या त्यांची चौकशी सुरु आहे. यापुढे नागरी पुरवठा खात्यातील तांदूळ व इतर रेशन धान्याचा पुरवठा खात्याच्या गोदामातून थेट प्रत्येक रेशन सोसायटय़ामध्ये जाणार आहे. याशिवाय गरीब व मागास वर्गातील लाभधारकांना त्यांच्या वाटय़ाचे धान्य थेट घरी पोचविण्याची सोय करण्याचा विचार आहे, असेही मंत्री रवी नाईक यांनी स्पष्ट केले.
धान्य वितरणावर भरारी पथकांची नजर
नागरी पुरवठा खात्याचे राज्यात 11 गोदाम असून 454 रेशनधान्य दुकाने आहेत. त्यांच्यावरही भरारी पथकांची नजर असेल. नागरिकांकडून वितरणाबाबत तक्रारी आल्यास त्यांची दखल घेतली जाईल. प्रत्येक लाभधारकापर्यंत सुरळीत रेशन पुरवठा होतो की नाही याकडे आमचे लक्ष असेल, असेही त्यांनी सांगितले.
लवकरच रेशनकार्डांचे होणार सर्वेक्षण
सध्या दारिद्रय़ रेषेखाली व अन्य गरीबांच्या नावे जी रेशनकार्डे आहेत त्यांचे नव्याने सर्वेक्षण केले जाणार आहे. ज्यामुळे खरे लाभधारक मोफत किंवा कमी दरात मिळणाऱया रेशनधान्यापासून वंचित राहणार नाहीत. तसेच गरीबांच्या नावाखाली रेशनधान्य लाटणाऱयांवर निर्बंध येतील, असेही त्यांनी सांगितले.