पंतप्रधान गरीब योजनेची यशस्वी अंमलबजावणी : 97.32 टक्के लोकांना मिळाला लाभ : धान्य वितरण मुदतीत वाढ
प्रतिनिधी / पणजी
लॉकडाऊनच्या काळात गोवा नागरी पुरवठा खात्याने प्रभावी कामगिरी केली आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचा लाभ राज्यातील तब्बल 97.32 टक्के लोकांनी घेतला आहे. अशा प्रकारची कामगिरी करणारे गोवा हे पहिले राज्य ठरले आहे, अशी माहिती नागरी पुरवठा खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी दिली. या योजनेतंर्गत तांदूळ, डाळ व साखर मोफत वितरित करण्यात आली. गोव्यात सध्या महिन्याकाठी तब्बल साडेसहा ते सात हजार मेट्रिक टन धान्याचे वाटप केले जात आहे.
सरकारमान्य स्वस्त धान्य (रेशन) दुकानातून राज्यात दर महिन्याला सुरळीतपणे धान्य पुरवठा करण्यात येत आहे. सामाजिक अंतर राखून लोकांना वेळेत धान्य पुरवठा करण्याकडे सरकारने लक्ष केंद्रीत केले आहे. राज्यात लॉकडाऊन असल्याने लोकांना मुबलक धान्य पुरवठा करता यावा यासाठी नागरी खाते प्रयत्नशील आहे. लॉकडाऊनच्या काळात लोकांना रेशनसाठी त्रास होऊ नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना राबवून तिचा लाभ सर्व राज्यांतील लोकांना मिळवून देण्याचे आवाहन राज्यांना केले होते. राज्य सरकारने ही योजना चांगल्या पद्धतीने राबवित हे धान्य वितरित केले. त्यामुळे तब्बल 97.32 टक्के लोकांना याचा लाभ मिळाला.
पीएचव्हाय योजने 5.59लाख लाभार्थी
रेशनकार्ड नसलेल्या ग्राहकांनाही सुरळीतपणे धान्य पुरवठा करण्यात आला. राज्यात 4800 ते 5000 मेट्रिक टन धान्याचे रेशनकार्डधारकांना वाटप केले जाते. प्रायोरिटी हाऊसहोल्ड योजनेखाली (पीएचव्हाय) सुमारे 2000 मेट्रिकटन धान्याचे वाटप केले जाते. दारिद्रय़ रेषेखालील असा उल्लेख योग्य वाटत नसल्याने सरकारने या योजनेचे नामकरण प्रायोरिटी हाऊसहोल्ड योजना असे केले आहे. या योजनेखालील लोकांना साखर मोफत दिली जाते. या योजनेखाली 5.49 लाख लोक लाभार्थी आहेत. दारिद्रय़रेषेखालील लोकांनाही दरात नफा न ठेवता वितरण केले जात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात रेशनधान्य कोटा योग्यप्रकारे उपलब्ध करता यावा याकडे नागरी पुरवठा खात्याने लक्ष केंद्रीत केले आहे. लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी वेळ मर्यादाही वाढवून देण्यात आली आहे.
दर महिन्याला 21 तारीखपर्यंत मुदत
धान्य कोटा उचलण्यास वेळ मिळावा व सामाजिक अंतर राखून धान्य कोटा उचलता यावा यासाठी धान्य वितरणाची मुदत वाढविण्यात आली आहे. केंद्रीय गृहव्यवहार मंत्रालयाच्या निर्देशानुसार अगोदर प्रत्येक महिन्याच्या 12 तारीखला धान्य कोटा उचलावा लागायचा. कोरोना व लॉकडाऊनमुळे सामाजिक अंतर राखून धान्य कोटा उचलावा लागतो. त्यामुळे रेशन धान्य दुकानासमोर मोठय़ा रांगा लागतात. त्यामुळे दिलेल्या मुदतीत धान्य कोटा उचलणे रेशनकार्डधारकांना शक्य होत नव्हते. त्यामुळे आता ही मुदत वाढवून 21 तारीख करण्यात आली आहे. आता दर महिन्याच्या 21 तारखेपर्यंत धान्य कोटा उचलणे ग्राहकांना शक्य होणार आहे.
जून महिन्यापर्यंतचा पुरेसा धान्य कोटा उपलब्ध
जून महिन्यापर्यंतचा कोटा सध्या गोदामामध्ये आहे. प्रत्येक तालुका गोदामामध्ये धान्य कोटा साठवून ठेवण्यात आला आहे. लॉकडाऊन असले तरी धान्य कोटा पुरवठय़ावर कोणताही परिणाम होणार नाही. धान्य कोटा मालवाहू रेल्वे गाडय़ांतून येत आहे. त्यामुळे पुरवठय़ावर कोणताही परिणाम होणार नाही. त्याचबरोबर ग्राहकांसाठी वितरण प्रक्रियाही सुरळीत राहणार आहे.
गोव्यात दुकानदाराला मिळतात प्रति किलो 2.70 रुपये
स्वस्त धान्य दुकानांसाठी धान्य वितरणासाठी प्रति किलो 2.70 रुपये एवढे मार्जिन असते. गोव्यातच स्वस्त धान्य दुकानांसाठी जास्त मार्जिन आहे. अन्य राज्यांमध्ये हे मार्जिन केवळ 70 पैसे प्रति किलो एवढे आहे. गोव्यात स्वस्त धान्य दुकानांतील रेशनकार्डधारकांची नोंदणी संख्या नगण्य असते. 250 ते 600 पर्यंत रेशनकार्डधारक असतात, मात्र अन्य राज्यांमध्ये हे प्रमाण पाच, सहा हजार असते.