अन्न-नागरी पुरवठा खात्याचे उपसंचालक चन्नबसप्पा कोडली यांची माहिती
प्रतिनिधी / बेळगाव
अन्न व नागरी पुरवठा खात्याच्यावतीने सर्व कार्डधारकांना योग्य पद्धतीने धान्य वितरित करण्यात येत आहे. जिल्हय़ात एकूण 1749 रेशन दुकाने असून या महिन्यात 797 दुकानांनी धान्य साठय़ाची उचल केली आहे. रेशन वितरण सुरळीत करण्यामध्ये राज्यात बेळगाव जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा खात्याचे उपसंचालक चन्नबसप्पा कोडली यांनी ‘तरुण भारत’ला दिली.
कोविड-19 ने निर्माण केलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना व राष्ट्रीय आहार सुरक्षा कायद्यानुसार सार्वजनिक धान्य वितरण योजनेंतर्गत मे महिन्याचे धान्य वाटप सुरू झाले आहे. पुढे ते म्हणाले, यापूर्वी दर महिन्याला अंत्योदय कार्डधारकांना 35 किलो तांदूळ देण्यात येत होता. या महिन्यात 35 किलोसह कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला वाढीव 5 किलो तांदूळ देण्यात येत आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत हे तांदूळ देण्यात येत आहेत.
बीपीएल रेशन कार्डधारकांना यापूर्वी एका व्यक्तीला 5 किलो तांदूळ देण्यात येत होते. आता एका व्यक्तीला 10 किलो तांदूळ देण्यात येणार आहेत. यापैकी 5 किलो राज्य सरकारकडून व 5 किलो पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत देण्यात येत आहेत. याशिवाय प्रत्येक कुटुंबाला एका कार्डाला दोन किलो गहू देण्यात येत आहेत, असे त्यांनी सांगितले.
कोविड-19 च्या नियमांचे पालन करून धान्य घेण्याचे आवाहन
एपीएल कार्डधारकांना एका सदस्याला 5 किलो तांदूळ व 2 किंवा त्यापेक्षा अधिक सदस्य असल्यास 10 किलो तांदूळ देण्यात येत आहेत. त्यासाठी प्रति किलो 15 रुपये दर आहे. कोणत्याही कार्डधारकाला कोणत्याही रेशन दुकानातून धान्य घेता येवू शकते. मात्र कार्डधारकांनी कोविड-19 च्या नियमांचे पालन करून धान्य घ्यावे, असे आवाहनही चन्नबसप्पा कोडली यांनी केले.