वादे वादे जायते तत्वबोधः असे म्हटले असले तरी एक वाद थांबवण्यासाठी दुसरा वाद सुरू करण्याचे तंत्र 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी अवलंबल्याचे दिसत आहे. सुप्रसिद्ध विज्ञान साहित्यिक जयंत नारळीकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱया या संमेलनाची उत्सुकता अनेक दिवसांपासून होती. एक तर कुसुमाग्रजांच्या नाशिक नगरीत ते होणार आणि दुसरे म्हणजे वि. वा. शिरवाडकरांनीच स्थापन केलेल्या लोकहितवादी मंडळाचा हा प्रस्ताव होता. आधी मार्च महिन्यात ते होणार होते. पण कोरोनाच्या लाटेमुळे स्थगित झाले. आता 3, 4 आणि 5 डिसेंबरला ते होत आहे, पण निरनिराळय़ा वादांनी त्याला घेरले आहे. संमेलनासाठी आधी दिल्लीचे निमंत्रण होते, पण ते नाकारून नाशिकचे स्थळ ठरले. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर एकही अ.भा. मराठी साहित्य संमेलन दिल्लीत झाले नाही,.दिल्लीकरांना मराठी अस्मितेचे दर्शन घडावे, असा हेतू ठेवून ’सरहद’ या संस्थेने निमंत्रण दिले होते. पण ते डावलण्यात आले. त्यानंतर लोकहितवादी मंडळाच्या आर्थिक व्यवहारावर साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी संशय घेतल्याने वाद निर्माण झाला. पण स्वागताध्यक्षपदी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ असल्याने संयोजनात कसलीही उणीव भासणार नाही, याची खात्री महामंडळाला होती. तेवढय़ात संमेलनाचे स्थळ बदलून आडगावच्या भुजबळ नॉलेज सिटीत ते हलवण्यात आले. हा वाद शमतो न शमतो तोच, लोकहितवादी गोपाळ हरि देशमुख यांच्या नावे नाना शंकरशेठ यांचे छायाचित्र प्रसिद्ध झाले आणि सावळय़ागोंधळात भर पडली. मग, छगन भुजबळ यांची स्तुती करणारे संमेलनाचे स्वागतगीत प्रसिद्ध झाले. त्यात स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे नाव नसल्यावरून वाद निर्माण झाला. विविध संघटनांनी निषेधाचे नारे दिल्यावर सावरकरांचे नाव त्यात घालण्यात आले. आता संमेलनस्थळाला सावरकरांचे नाव देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. दुसरीकडे, महाकवी वामनदादा कर्डक आणि साहित्यकि बाबूराव बागूल यांची नावे मुख्य प्रवेशद्वारांना देण्यात यावीत, असे छात्रभारतीने म्हटले आहे. संमेलनाचे उद्घाटक कोण असावेत, यावरूनही बरीच भवती न भवती झाली. गीतकार जावेद यांच्या हस्ते उद्घाटन नको म्हणून ओरडा झाला. त्यानंतर कादंबरीकार विश्वास पाटील यांचे नाव पुढे आले. तर नोकरीत असताना त्यांच्यावर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत गैरव्यवहार केला असल्याचे आरोप झाले होते, या मुद्यावरून गोंधळ सुरू झाला. त्यातच पालकमंत्री छगन भुजबळ हेही तुरुंगातून जामीनावर सुटलेले आहेत, तरीही ते स्वागताध्यक्ष आहेतच ना, अशी पुस्ती कुणीतरी जोडली. भरीस भर म्हणजे, संमेलनातील कार्यक्रमाची मूळ पत्रिका बदलून नवे कार्यक्रम ठरवण्यात आले. संमेलनाध्यक्ष नारळीकर यांच्या प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमावरून वाद घालण्यात आला. थोडक्मयात, संमेलनातील कोणतीही गोष्ट वादाशिवाय पूर्णत्वाला न्यायचीच नाही, असे चित्र आहे. कुसुमाग्रजांच्याच शब्दांत सांगायचे तर ’तुमचे रेशीमकाठी वादविवाद श्रवणीय, मननीय आणि माननीयही आहेत, पण हिमलाटेत कुडकुडणाऱया त्या नागडय़ा पोरांकडे मला जायचे आहे, त्यांच्या अंगणात जाळ पेटवण्यासाठी…’ वादविवादाची खानदानी प्रवचनं झोडणाऱयांच्या डोळय़ात जळजळीत अंजन घालण्याचे काम शिरवाडकरांनी आधीच करून ठेवले होते. संमेलनात मुख्य आकर्षण असलेल्या ग्रंथप्रदर्शन आणि विक्रीसाठी पुरेशी जागा दिली नसल्याने पुण्यातल्या अनेक मान्यवर प्रकाशकांनी नाशिकला जाणार नसल्याचे सांगितले आहे. शिवाय, संमेलनाच्या उद्घाटन आणि समारोपाला प्रमुख पाहुणे म्हणून असलेली राजकीय नेत्यांची उपस्थिती आणखी राळ उडवणार आहे, हेही ध्यानात घेतलेले बरे. साहित्य संमेलन नेमके कशासाठी, असा प्रश्न पडावा अशी सध्याची स्थिती आहे. सामान्य माणसाचे प्रश्न साहित्यातून मांडले जाणार आहेत का नाही? ’बन्सीधरा, आता तू कुठे जाशील’सारख्या कथेतून श्री. म. माटेंनी जे भेदक वास्तव मांडले ती ताकद नव्या पिढीच्या लेखकांमध्ये आहे का? भारतात सर्वाधिक बोलल्या जाणाऱया पहिल्या पाच क्रमांकात असलेल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नाही. साडेआठ कोटी मराठी भाषिकांची ही एकप्रकारे अवहेलनाच म्हणावी लागेल. मराठीतून लिहिणाऱया लेखक-साहित्यिक-कवींची पिढी बदलली आहे. अनेक तरुण लिहायला लागले आहेत, पण वाचणारे तरूण आहेत का? हा कळीचा मुद्दा आहे. चाळीशी-पन्नाशी उलटलेल्यांना साहित्य संमेलनाचा पुळका आहे. तरुणाई मात्र त्यापासून दूर आहे. विरोधाभास म्हणजे, अनेक मराठी साहित्यिकांची मुले-मुली इंग्रजी माध्यमातून शिकली आहेत आणि आता परदेशात नोकरीनिमित्ताने ती स्थायिक आहेत. वाचकांना स्तिमित करणारे, धक्का देणारे आणि त्यांचे डोके भंजाळून टाकणारे लेखन मराठीतून आता अभावानेच केले जात आहे. या ढासळत्या दर्जाची चर्चा साहित्य संमेलन करणार आहे की नाही? जगभरात ’साय-फाय’ला म्हणजे ’सायन्स फिक्शन’ला मोठय़ा प्रमाणावर वाचक आहेत. विज्ञानातील हे अचंबित करणारे आभासी सत्य मराठी वाचकांपर्यंत पोचवणाऱया जयंत नारळीकरांची कामगिरी अजोड आहे. बाळ फोंडके, सुबोध जावडेकर, लक्ष्मण लोंढे, निरंजन घाटे अशा पहिल्या फळीतील विज्ञान लेखकांनंतर पुढची पिढी नावारूपाला का आली नाही, याचा शोध घ्यायला हवा. मराठी तरुणांची पुस्तक वाचनाची सवय नाहीशी झाली आहे. मोबाईल नावाच्या यंत्राने त्यांच्या हातात सगळे विश्व आणून ठेवले आहे. त्यामुळे पुस्तक वाचून त्याचे अन्वयार्थ लावण्याचे कष्ट ही पिढी घेत नाही. मराठी वाचक घटत आहे, ही चिंतेची बाब आहे. संमेलनाला हजारोंची उपस्थिती ही उत्सवी मानसिकता आहे. कोटय़वधी रूपयांचा चुराडा करून आणि शड्डू ठोकून वाद घालून होणाऱया साहित्य संमेलनाचा अभिमान कसा बाळगायचा, हा अनुत्तरित प्रश्न आहे. बंद पडलेली मराठी नियतकालिके, समाजमाध्यमांतून बिघडत चाललेली मराठी भाषा, नव्या कसदार लेखकांची वानवा, उपजीविकेसाठी अजिबात उपयोगी न पडणाऱया मराठी भाषेकडे तरुणाईने फिरवलेली पाठ अशा अनेक आव्हानांचा मुकाबला हे साहित्य संमेलन करणार आहे की नाही? ते सामर्थ्य अशा संमेलनात असेल तरच या उत्सवाला काही अर्थ आहे, अन्यथा नाही इतकेच.
Previous Articleत्रिपुरामधील निवडणुकीत भाजपचा निर्विवाद विजय
Next Article सरबज्योत सिंगला नेमबाजीत सुवर्ण
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.