दौरा अर्ध्यावर सोडून दिल्याने संघव्यवस्थापन नाराज, धोनीशी वाद झाल्याची कुजबूज
वृत्तसंस्था/ दुबई
यंदाची आयपीएल अर्ध्यावरच सोडून मायदेशी परतल्याने सुरेश रैनासाठी यापुढे चेन्नई सुपरकिंग्स संघातून खेळणे जवळपास कठीण ठरणार आहे. दुबईतून मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नई संघव्यवस्थापन रैनावर अतिशय नाराज आहे आणि अशा परिस्थितीत त्याला पुन्हा करारबद्ध करण्याची शक्यता जवळपास मावळलेली असू शकते. रैनाने वैयक्तिक कारणास्तव आपण परतत असल्याचे जाहीर केले. पण, हॉटेलमधील खोलीला बाल्कनी नसल्याने त्याने नाराजीने मायदेशी परतणे पसंत केल्याची चर्चा नंतर रंगली आहे.
मागील आठवडय़ात चेन्नई सुपरकिंग्स संघातील 2 खेळाडूंसह 13 सदस्य कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. या पार्श्वभूमीवर संघातील उर्वरित खेळाडूंना हॉटेलवर असताना काही बंधने पाळणे क्रमप्राप्त होते. त्यावरही 32 वर्षीय रैना आपल्या संघव्यवस्थापनावर नाराज होता, असे वृत्त आहे.
आयपीएलशी संबंधित एका सूत्राने, रैनाने चक्क रुमला बाल्कनी नव्हती, म्हणून दुबई सोडून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला, असा दावा केला. चेन्नई सुपरकिंग्सने जे निश्चित केले, त्यानुसार, कर्णधार, प्रशिक्षक व व्यवस्थापक यांना मोठय़ा खोल्यांची रुम दिली जाते. रैनालाही अन्य खेळाडू, सदस्यांप्रमाणे रुम देण्यात आली. पण, त्या रुमला बाल्कनी नव्हती, त्यावर रैना नाराज होता, असा सूत्राने दावा केला आहे.
तूर्तास, रैना संघातून मायदेशी परतला असल्याने यंदाचा त्याचा करार तर रद्द होऊ शकतोच. पण, त्याही शिवाय पुढील हंगामापासूनही चेन्नई सुपरकिंग्स प्रँचायझीचे दरवाजे त्याच्यासाठी कायमचे बंद होऊ शकतात, असे संकेत आहेत. रैनाचे धोनीशी मतभेद झाल्याचेही वृत्त आहे. पण, अद्याप याला दुजोरा मिळालेला नाही.
सलामी लढतीतून चेन्नई सुपरकिंग्सला डच्चू मिळण्याची शक्यता
पूर्वनियोजित रुपरेषेनुसार, यंदा आयपीएल हंगामातील सलामीची लढत विद्यमान विजेते मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात होणे अपेक्षित होते. पण, एकाच वेळी 2 खेळाडूंसह 13 सदस्य कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या संघाला त्यातून सावरण्यासाठी काहीसा अवधी मिळावा, यासाठी त्यांना सलामी लढतीतून वगळले जाण्याची शक्यता आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीचा समावेश असल्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरला या सलामी लढतीत पाचारण केले जाण्याची शक्यता चर्चेत आहे.
‘मिस्टर आयपीएल’ ‘आऊट’, ऋतुराज गायकवाड ‘ईन’
डावखुऱया सुरेश रैनाने आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक धावा जमवल्या. यामुळे त्याला ‘मिस्टर आयपीएल’ असे संबोधले जाते. पण, यंदा अनेक नाटय़मय घडामोडीनंतर हा मिस्टर आयपीएल खेळाडूच हंगामाबाहेर गेला आहे. केवळ मागील हंगामातच रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरच्या विराट कोहलीने त्याचा आयपीएलमधील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडीत काढला. सध्याच्या घडीला आयपीएलमध्ये विराटच्या खात्यावर 5412 तर रैनाच्या खात्यावर 4527 धावा आहेत. दरम्यान, रैना मायदेशी परतल्यानंतर त्याच्याऐवजी ऋतुराज गायकवाड हा युवा खेळाडू संघाचे प्रतिनिधीत्व करेल, असे चेन्नई संघव्यवस्थापनाने जाहीर केले आहे.
ब्रॉडकास्टर पथकातील एका सदस्याला कोरोना
कोरोनाचा धोका टाळण्यासाठी बीसीसीआयने यंदाची आयपीएल स्पर्धा युएईमध्ये हलवली असली तरी हा मूळ हेतू तरी साध्य होणार का, याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे. चेन्नईच्या पथकातील 13 सदस्य कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता या स्पर्धेचे प्रसारण करणाऱया स्टार इंडियाच्या पथकातील एक सदस्यही कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे आणि यामुळे आयोजकांच्या अडचणीत आणखी भरच पडली आहे.
स्टार इंडियाचे पथक सोमवारी दुबईकडे रवाना होणार होते. पण, त्यापूर्वीच निर्मिती विभागातील एका सदस्याला कोरोना असल्याचे स्पष्ट झाले व यामुळे स्टार इंडियाच्या पूर्ण पथकाला आपला प्रवास लांबणीवर टाकावा लागला. पूर्वनियोजित रुपरेषेनुसार, स्टार इंडियाच्या पहिल्या पथकातील सदस्य बेंगळूर, दिल्ली, कोलकाता व मुंबई येथून दुबईला रवाना होणार होते. सर्व सदस्यांना पुढील सूचनेपर्यंत प्रतीक्षा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.