वृत्तसंस्था / नवी दिल्ली
रिसर्च अँड ऍनालिसिस विंग (रॉ) चे प्रमुख सामंत कुमार गोयल आणि इंटेलिजेन्स ब्युरोचे (आयबी) संचालक अरविंद कुमार या दोघांचाही कार्यकाळ केंद्र सरकारने एक वर्षासाठी वाढविला आहे. अरविंद कुमार आणि गोयल हे दोघेही 1984 च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी आहेत. गोयल हे पंजाब कॅडर तर कुमार हे आसाम-मेघालय कॅडरचे आहेत.
फेब्रुवारी 2019 मध्ये पाकिस्तानातील बालाकोट येथे एअर स्ट्राइक आणि 2016 च्या सर्जिकल स्ट्राइकची रणनीति आखणाऱया अधिकाऱयांमध्ये सामंत सामील होते. सामंत यांना पाकिस्तानविषयक तज्ञ मानले जाते. 1990 च्या दशकात उग्रवादाला तोंड देणाऱया पंजाबची स्थिती सांभाळण्यात त्यांनी भूमिका बजावली होती. तर अरविंद कुमार यांना जम्मू-काश्मीर विषयक तज्ञ मानण्यात येते. सामंत यांनी 26 जून 2019 रोजी रॉ प्रमुखाचा पदभार हाती घेतला होता. त्यांनी अनिल धस्माना यांची जागा घेतली होती. तर अरविंद कुमार यांनीही त्याच दिवशी आयबी संचालक म्हणून धुरा सांभाळली होती. त्यांच्यापूर्वी राजीव जैन हे आयबीचे प्रमुख होते. जैन आणि धस्माना हे डिसेंबर 2016 मध्ये नियुक्त झाले होते.