ऑनलाईन टीम / काठमांडू :
नेपाळचे पंतप्रधान के.पी.शर्मा ओली आणि रिसर्च अँड अॅनलिसिस विंगचे (रॉ) प्रमुख सामंत कुमार गोयल यांच्या भेटीने नेपाळमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे.
‘रॉ’ ही भारताची गुप्तचर यंत्रणा आहे. नुकतीच रॉ प्रमुख सामंत कुमार गोयल यांची टीम विशेष विमानाने काठमांडूला गेली होती. त्यावेळी के.पी.शर्मा ओली यांनी गोयल यांची भेट घेतली. त्यानंतर देशाच्या पंतप्रधानांनी दुसऱ्या देशाच्या गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखाला भेटणे अयोग्य असल्याची टीका पुष्पा कमाल दहल प्रचंड, झालानाथ खानाल आणि माधव कुमार नेपाळ या माजी पंतप्रधानांनी केली.
गोयल यांच्या 24 तासांच्या दौऱ्यात त्यांनी आणि त्यांच्या टीमने विरोधी पक्षाचे नेते शेर बहादूर देउबा, माजी पंतप्रधान बाबूराम भट्टाराय यांची सुद्धा भेट घेतली. दरम्यान, भारताच्या हद्दीतील लिपुलेख, लिम्पियाधुरा, कालापानी हे तिन्ही भाग नेपाळने आपल्या नकाशात दाखवून, नवीन नकाशाला संसदेत मंजुरी दिली आहे. त्यावरून दोन्ही देशात निर्माण झालेला तणाव आता निवळत आहे. भारताचे लष्करप्रमुख एम.एम.नरवणे पुढच्या महिन्यात नेपाळ दौऱ्यावर जाणार आहेत.