नवी दिल्ली
भारत आणि नेपाळ यांच्यातील संबंध आता सुरळीत होऊ लागले आहेत. मागील महिन्यात रॉ प्रमुख सामंत कुमार गोयल हे नेपाळच्या दौऱयावर गेले होते. त्यानंतर चालू महिन्यात सैन्यप्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांनी काठमांडूचा दौरा केला होता. तर आता विदेश सचिव हर्षवर्धन श्रृंगला शेजारी देशाला भेट देणार आहेत. चालू महिन्याच्या अखेरीस त्यांचा हा दौरा होऊ शकतो. 23 ऑक्टोबर रोजी रॉ प्रमुख गोयल काठमांडूला गेले होते. त्यांच्या या दौऱयावर नेपाळी प्रसारमाध्यमांच्या एका गटाने अनेक प्रश्न उपस्थित केले होते. भारताने एखाद्या राजनयिकाच्या जागी गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखाला का पाठविले, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर भारतीय सैन्यप्रमुख जनरल नरवणे यांनी नेपाळचा दौरा करत पंतप्रधान केपी शर्मा ओली तसेच तेथील सैन्यप्रमुख थापा यांची भेट घेतली होती. भारत आणि नेपाळदरम्यान लिपुलेख, लिम्पियाधुरा आणि कालापानी या भूभागांवरून वाद झाला होता. भारताने या भूभागात अत्यंत आधुनिक महामार्ग तयार केला आहे. तर नेपाळने या भूभागावर स्वतःचा दावा सांगितला आहे. नेपाळने चीनच्या चिथावणीमुळेच ही आगळीक केल्याचे सैन्यप्रमुख नरवणे यांनी म्हटले होते.