मंत्री अरविंद लिंबावळी : बेंगळुरात पत्रकारांशी संवाद
प्रतिनिधी / बेंगळूर
बेंगळुरात वॉर्डनिहाय समितीची स्थापना करून त्यांच्या नेतृत्त्वाखाली कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक वॉर्डातील समितीत किमान 50 जण असणार असून त्यामध्ये डॉक्टर, परिचारिका, स्वयंसेवक आणि स्थानिकांचा समावेश राहणार आहे, अशी माहिती मंत्री अरविंद लिंबावळी यांनी दिली. बेंगळूरच्या विधानसौध येथे पत्रकारांशी ते बोलत होते.
मंत्री लिंबावळी पुढे म्हणाले, समितीतील सदस्यांनी कोरोनाबाधितांना ट्रयेजिंग सेंटर (चिकित्सानिर्धार केंद्र) मध्ये घेऊन आल्यानंतर त्याठिकाणी रोगाच्या लक्षणांनुसार त्यांचे वर्गीकरण केले जाईल. तीव्र लक्षणे असणाऱयांना रुग्णालयात, सामान्य लक्षणे असणाऱयांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार आहे. तर सौम्य रोगाची लक्षणे असणाऱयांना घरातच क्वारंटाईन करून त्यांना सर्व औषधे पुरविली जाणार आहेत. शहरातील झोपडपट्टी भागात राहणाऱयांना घरामध्ये क्वारंटाईन करणे शक्य होणार नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी प्रत्येक वॉर्डामध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येत आहे. ही वार्डनिहाय समितीची पद्धत यापूर्वी मुंबई आणि चेन्नईमध्ये यशस्वी झाली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, असे मंत्री लिंबावळी यांनी सांगितले.
प्रत्येक तालुक्यात कोविड सेंटर सुरू झाले आहेत. तेथील रुग्णांचा तपशील केंद्रीय जिल्हा वार रूमला पाठविण्यासह त्या-त्या जिल्हय़ात उपलब्ध असलेले सामान्य बेड, आयसीयु आणि एचडीयु बेडचा तपशील प्रदर्शित करण्याची सूचना करण्यात आली आहे. बेंगळुरात 9 झोनल कमांड सेंटर असून त्यांची सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बेड वितरण झालेल्यांना यापूर्वी एसएमएस (संदेश) जात नव्हता. पण आता संपूर्ण माहिती एसएमएसद्वारे पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी पक्षभेद विसरून वॉर्ड समितीमध्ये सक्रियपणे सहभागी होत कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी सहकार्य करावे, असेही मंत्री म्हणाले.