प्रतिनिधी / सोलापूर
सरळसेवा भरती सन २०१९ अन्वये जाहीरातीनुसार सन २०१९ नुसार एस.टी. महामंडळाने रिक्त असलेल्या जागी चालक तथा ग्राहक पदाची एकूण ८ हजार २२ पदे भरण्याचा निर्णय घेतला त्यानुसार नियमाप्रमाणे ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवून परिक्षा घेण्यात आली. तसेच परिक्षेत पास झालेल्या सुमारे ४ हजार ५०० पात्र उमेदवारांपैकी १ हजार ३०० उमेदवारांचे प्रशिक्षण पूर्ण करून चालक तथा वाहक पदावर रोजंदार गट क्र.१ मध्ये नियुक्त्या दिलेल्या आहेत. तसेच सुमारे ३ हजार २०० चालक तथा वाहक पदाकरीता प्रशिक्षण सुरू आहे. तसेच राज्य संवर्ग सुमारे १५० व सुमारे ८२ अधिका-यांचे प्रशिक्षण सुरू आहे. परंतू राज्य परिवहन महामंडळाने चालक तथा वाहक पदामध्ये रोजंदार गट क्र.१ मध्ये नेमणूक देण्यात आलेल्या कर्मचा-यांची सेवा तात्पूरत्या स्वरूपात खंडीत करण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड व सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी केली आहे.
सदरचा निर्णय घेतल्यामुळे निवड यादीमधील सुमारे ४ हजार ५०० चालक तथा वाहक तसेच सुमारे १५० राज्य संवर्ग व सुमारे ८२ अधिका-यांना प्रशिक्षण स्थगित केल्याने कर्मचा-यांचा कोणताही दोष नसताना तात्पुरत्या नौक-या गमवाव्या लागत आहेत ही बाब अत्यंत गंभीर असून, माणूसकीला काळीमा फासणारी आहे. राज्य परिवहन महामंडळाने भरती करताना आवश्यक असलेल्या रिक्त जागीच जाहीरात काढून भरती केलेली आहे. तर मग केवळ कोरोना महामारीमुळे आर्थिक स्त्रोत पूर्णपणे थांबलेले आहेत. या नावाखाली सेवा स्थगित करण्याच्या निर्णयामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ येणार आहे.
महाराष्ट्र शासनाने निर्णयान्वये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लॉकडाऊन कालावधीत बेघर /विस्थापित कामगार व परराज्यातील अडकलेली कामगार यांच्या वेतनात अथवा मजुरीत कोणतीही कपात न करण्याबाबत अथवा कामावरून कमी न करण्याबाबत आदेश निर्गमीत केलेले आहेत. तरीसुध्दा महाराष्ट्र शासनाच्या अंगीकृत उपक्रम असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात शासन निर्णयाला केराची टोपली दाखविली आहे.
सरळसेवा भरती अंतर्गत चालक तथा वाहक, सहाय्यक, लिपीक टंकलेखक, राज्य संवर्ग व अधिकारी पदामध्ये व अनुकंपातत्वावर उमेदवार प्रशिक्षण घेत असल्यास सदर उमेदवारांचे प्रशिक्षण देखील आज रोजी तात्पूरत्या स्वरुपात पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात यावे असा निर्णय घेतलेला आहे. एस.टी. कर्मचा-यांच्या निधनानंतर त्यांच्या पाल्यास अनुकंपा तत्वावर शैक्षणिक पात्रतेनूसार नियुक्ती दिली जाते. एस.टी. कर्मचा-यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असते अशा परिस्थितीत अनुकंपा तत्त्वावर प्रशिक्षण थांबविणे म्हणजे त्या कुटूंबियांची आर्थिक पिळवणूक केल्यासारखे होय. त्यामुळे सरळसेवा भरती सन-२०१९ अंतर्गत चालक तथा वाहक, सहाय्यक, लिपिक टंकलेखक, राज्य संवर्ग, अधिकारी व अनुकंपा तत्वावर प्रशिक्षण स्थगित करण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, परिवहन राज्यमंत्री यांच्याकडे केल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड व सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी सांगितले.
सरळ सेवा भरती सन २०१९ अंतर्गत चालक तथा वाहक पदाची भरती करताना एसटी महामंडळास आवश्यक असलेल्या जागेवरच जाहीरात काढून भरती करण्यात आलेली तर मग आता सेवा तात्पुरती खंडित कश्यासाठी? सेवा खंडित करण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याने तात्काळ मागे घ्यावा.
मुकेश तिगोटे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)