वृत्तसंस्था / नवी दिल्ली
एप्रिल महिन्यात देशात 88 लाख लोकांना रोजगार मिळाला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमीच्या (सीएमआयई) अहवालानुसार कोरोना महामारीनंतर एका महिन्यात मिळालेल्या या सर्वाधिक नोकऱया आहेत. परंतु रोजगाराच्या मागणीच्या तुलनेत उपलब्ध नोकऱयांचे प्रमाण कमी राहिले आहे.
भारताचे मनुष्यबळ एप्रिलमध्ये 8.8 दशलक्ष वाढून 437.2 दशलक्ष (43.72 कोटी) जाले आहे. महामारीच्या प्रारंभापासून हे प्रमाण सर्वात मोठी मासिक वृद्धीपैकी एक असल्याचे सीएमआयईचे व्यवस्थापकी संचालक आणि सीईओ महेश व्यास यांनी सांगितले आहे.
88 लाख लोकांना रोजगार मिळण्याचा अर्थ यातील बहुतांश असे लोक आहेत, ज्यांना काही कारणांमुळे नोकरीतून बाहेर पडावे लागले होते आणि आता ते कामावर परतले आहेत. कामकाज करू शकणाऱया वयोगटाची लोकसंख्या दर महिन्याला 20 लाखांपेक्षा अधिक वाढत नाही आणि याहून अधिक वृद्धीचा अर्थ नोकरीबाहेर असलेले लोक पुन्हा नोकऱयांमध्ये परतले असा निघत असल्याचे अहवालात म्हटले गेले आहे.
एप्रिलमध्ये रोजगारात 88 लाखांची वाढ मागील तीन महिन्यांदरम्यान 1.20 कोटींच्या घसरणीनंतर झाली आहे. एप्रिलमध्ये रोजगारात वृद्धी उत्पादन अन् सेवा क्षेत्रात झाली आहे. उत्पादन क्षेत्रात 55 लाख रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. तर सेवा क्षेत्रात 67 लाख रोजगार जोडले गेले. तर यादरम्यान कृषी क्षेत्रातील रोजगार 52 लाखांनी घटला आहे.
यापूर्वी सीएमआयईने बेरोजगारीसंबंधी आकडेवारी जारी केली होती. यानुसार एप्रिलमध्ये देशात बेरोजगारी दर वाढून 7.83 टक्क्यांवर पोहोचला आहे. यापूर्वी मार्च महिन्यात हे प्रमाण 7.60 टक्के राहिले होते. सीएमअयाईच्या आकडेवारीनुसार मार्च महिन्यात शहरी बेरोजगारीचा दर 9.22 टक्के तर ग्रामीण भागांसाठी 7.18 टक्के राहिला होता.