आंबेवाडी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील कामगारांची मागणी : जिल्हा पंचायतवर मोर्चा काढून दिले निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेतील (नरेगा) अकुशल कामगारांना वर्षभरात 100 दिवस काम द्यावे आणि रोजगार हमीचे काम सुरळीत करावे, या मागणीसाठी आंबेवाडी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील आंबेवाडी, मण्णूर व गोजगा गावातील रोहयो कामगारांनी मंगळवारी जिल्हा पंचायतवर मोर्चा काढला आणि याबाबतचे निवेदन सीईओ दर्शन एच. व्ही. यांच्याकडे सादर केले.
आंबेवाडी ग्रामपंचायतला रोजगार मिळण्याबाबत महिला कामगारांनी दाखल केलेला अर्ज ग्रामपंचायतीने स्वीकारला नाही. त्यानंतर पुन्हा पोस्टाद्वारे रीतसर रजिस्टर करूनदेखील ग्रामपंचायतीने तो न स्वीकारल्यामुळे तिन्ही गावातील रोहयो कामगार अडचणीत आले आहेत. चालू वर्षात तरी आंबेवाडी ग्रामपंचायतीतून रोहयो कामगारांना 100 दिवस काम द्यावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
कोरोनामुळे दोन वर्षे काम कमी
गत दोन वर्षांत कोरोनामुळे रोहयोअंतर्गत पूर्ण दिवस काम मिळाले नाही. शिवाय काम सुरळीत न चालल्यामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला नाही. त्यामुळे रोहयो कामगारांच्या अर्थकारणावर परिणाम झाला. चालू वर्षात तरी आंबेवाडी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील कामगारांना पूर्ण दिवस काम द्यावे, अशी मागणीदेखील रोहयो कामगारांनी केली आहे.
यावेळी उर्मिला कातकर, लक्ष्मी कदम, व्ही. एम. चौगुले, एस. एस. कातकर, रेखा जाधव, सुलोचना तरळे, एस. बी. मंडोळकर, एल. व्ही. होनगेकर यांसह रोहयो कामगार उपस्थित होते.