रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून होणार कार्यवाही,कोकण रेल्वे सूत्रांची माहिती
प्रतिनिधी / रत्नागिरी
कोकण रेल्वेच्या रोहा ते रत्नागिरी या 285 किमीच्या टप्प्यातील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून याची तपासणी (सीआरएस इन्स्पेक्शन) होऊन हिरवा कंदिल मिळवण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे मार्चच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत ही तपासणी पूर्ण होर्याची शक्यता असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.
सीआरएस इन्स्पेक्शनसाठी याच आठवडय़ात कोकण रेल्वे प्रशासनाकडून प्रस्ताव पाठवला जाणार आहे. यावर तत्काळ कार्यवाही होउन रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडय़ात पाहणी होईल, असे रेल्वे सूत्रांनी सांगितले. रोहा ते रत्नागिरी या 285 किमीच्या टप्प्यातील विद्युतीकरणासाठी 1100 कोटी रुपये खर्च आला आहे. पूर्ण विद्युतीकरण व शक्य तेथे दुपदरीकरण ही दोन्ही कामे एकाच वेळी सुरु आहेत. दक्षिण टोकाकडील गोवा ते कारवार टप्प्याचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. आता रोहा ते रत्नागिरी पट्टयातील विद्युतीकरणही पूर्ण झाले आहे. सुरक्षा आयुक्तांकडून याची तपासणी झाल्यानंतर हा मार्ग विजेवर चालणाऱया गाडय़ांच्या सेवेसाठी सोपवला जाणार आहे.
नवीन स्थानकांचे कामही जोरात…..
विद्युतीकरण आणि दुपदरीकरणाबरोबरच 10 नवीन स्थानके उभारण्याचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. यातील खारेपाटण व सापेवामने स्थानके कार्यान्वित झाली आहेत. रत्नागिरी जिह्यातील कंळबणी आणि कडवई स्थानकांचेही लवकरच उद्घाटन करण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.