बंगालच्या उपसागरातील भासन चार बेटावर रवानगी : बांगलादेशात रोहिंग्यांविषयीची धारणा बदलली
वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशात चित्तगाव बंदरापासून 60 किलोमीटर अंतरावर बंगालच्या उपसागरात ‘भासन चार’ नावाचे बेट आहे. हे बेटच आता बांगलादेशात आश्रय घेतलेल्या रोहिंग्या शरणार्थींचे नवे ठिकाण ठरले आहे. 4 डिसेंबर रोजी चित्तगाव बंदरातून 1,642 शरणार्थींना बळजबरीने तेथे पाठविण्यात आले आहे. तेथे सरकारने त्यांच्या निवाऱयाची व्यवस्था केलेली असली तरीही पूर आणि वादळाचा धोका कायम असतो. याचमुळे जगातील सर्वात मोठय़ा शरणार्थी शिबिरात धास्तीचे वातावरण आहे.
परंतु या शरणार्थींना बळजबरीने बेटावर पाठविले जात नसल्याचा प्रशासनाकडून केला जात आहे. रोहिंग्या आता ‘दक्षिण आशियातील पॅलेस्टिनी’ ठरू लागल्याचे उद्गार युरोपीय रोहिंग्या कौन्सिलच्या पदाधिकारी आंबिया परवीन यांनी काढले आहेत. बांगलादेशच्या कॉक्स बाजार येथील शिबिरात सुमारे 10 लाख रोहिंग्यांचे वास्तव्य आहे.
म्यानमार सैन्याकडून हुसकावून लावण्यात आल्यानंतर रोहिंग्यांनी बांगलादेशात आश्रय घेतला आहे. 16.5 कोटी लोकसंख्या असलेले बांगलादेशचे लोक आता रोहिंग्यांना मदत करू इच्छित नाहीत. रोहिंग्यांविषयीची धारणा आता बदलली आहे. म्यानमार सीमेवरुन शस्त्र आणि अंमली पदार्थांची तस्करी करण्यासह रोहिंग्या हिंसाचार आणि आजार फैलावत असल्याचे स्थानिक लोकांचे मानणे आहे.
भासन चार बेट माणसांच्या वास्तव्यायोग्य आहे की नाही हे सांगणे अवघड असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार संघटनेत कार्यरत येंगी ली यांनी म्हटले.
20 वर्षां पूर्वी समुद्रात शोधण्यात आलेले भासन चार बेट 13 हजार एकर क्षेत्रात फैलावलेले आहे. तेथे एक लाख रोहिंग्या राहू शकतात. बेटावर जाऊ इच्छिणाऱया शरणार्थींनाच पाठविले जात असल्याचा दावा बांगलादेश सरकारने केला आहे. बांगलादेशच्या नौदलाने 22 हजार कोटी रुपये खर्चुन तेथे शिबिराची निर्मिती केली आहे.
कट्टरता रोखण्यासाठी चकमकी, 100 ठार
रोहिंग्या शरणार्थींच्या शिबिरात धार्मिक कट्टरता रोखण्यासाठी बांगलादेशच्या पोलिसांनी सुरक्षा वाढविली आहे. 2017 पासून आतापर्यंत 100 हून अधिक रोहिंग्या चकमकीत मारले गेले आहेत. कट्टरता रोखण्यासाठी सरकारने रोहिंग्यांवर कठोर निर्बंध लादले आहेत. इंटरनेटचा वापर करता येऊ नये, म्हणून रोहिंग्यांना मोबाईल सिम दिले जात नाही. तसेच त्यांना बँकेत खाते उघडता येत नाही. याचबरोबर त्यांच्या मुलांना शाळेत प्रवेश नाकारला जातोय. रोहिंग्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी भासन चारच्या क्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तेथे प्रशासकीय व्यवस्थेसाठी स्थापन समितीत एकाही रोहिंग्याचा समावेश करण्यात आलेला नाही.