राष्ट्रीय निवड समितीने मर्यादित षटकांच्या संघातील उपकर्णधार व स्टार फलंदाज रोहित शर्माला आगामी ऑस्ट्रेलिया दौऱयातून वगळले गेल्यानंतर सोशल मीडियावर अक्षरशः प्रतिक्रियांची बरसात झाली. काहींनी कारण स्पष्ट करण्याची मागणी केली तर काहींनी त्यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा समाचार घेण्यास सुरुवातही केली. बीसीसीआयने जाहीर केलेल्या भारतीय संघात मुंबई इंडियन्सच्या या स्टार फलंदाजाचा कोणत्याही क्रिकेट प्रकारासाठी समावेश नव्हता. त्यामुळे, त्यावर आगपाखड होणे, आश्चर्य व्यक्त केले जाणे साहजिक होते. पण, बुधवारी खुद्द रोहित शर्मानेच आपल्या ट्वीटर अकाऊंटवरील ‘इंडिया क्रिकेटर’ हे संबोधन स्वतः हटवले आणि चर्चेला आणखी उधाण आले.
बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱयात होणाऱया टी-20, वनडे आणि कसोटी संघात रोहितला वगळताना त्याला झालेल्या धोंडशिरेच्या दुखापतीचे कारण दिले. पण, दुसरीकडे, मुंबई इंडियन्स प्रँचायझीने रोहित सराव करत असल्याची काही छायाचित्रे व व्हीडिओ पोस्ट केल्यानंतर याबाबत चर्चेला खरी सुरुवात झाली. रोहित मुंबई इंडियन्सच्या तीन सामन्यात खेळू शकलेला नाही आणि 3 नोव्हेंबर रोजी होणाऱया लढतीसाठी तो उपलब्ध होऊ शकेल, असे सध्याचे संकेत आहेत.
वास्तविक, या दौऱयासाठी अद्याप बराच कालावधी बाकी आहे. नोव्हेंबरच्या अंतिम टप्प्यात प्रत्यक्ष दौऱयाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे, रोहितला तंदुरुस्त होण्यासाठी पुरेसा अवधी हाताशी होता. पण, यानंतरही त्याला वगळले जाणे आश्चर्याचे ठरले आहे. त्या पार्श्वभूमीवर, रोहितने आपल्या ट्वीटर व इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन इंडिया क्रिकेटर हे संबोधन काढले असल्याने टीम इंडियात सर्व आलबेल नसल्याचे प्रातिनिधीक चित्र निर्माण झाले आहे. अर्थात, हे सारे काही सुरु असताना रोहित मात्र आपली पत्नी ऋतिकासमवेत एका बीचवर पोहोचला आणि त्याने तेथील काही छायाचित्रेही पोस्ट केली.