दुखापतीमुळे बाहेर रहावे लागले असल्याने मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याचा सूर हरवलेला असू शकतो आणि प्रत्यक्षात अशीच स्थिती असेल तर त्याचा दिल्ली कॅपिटल्स संघ निश्चितपणाने लाभ घेईल, असे सलामीवीर शिखर धवनने म्हटले आहे. धोंडशिरेच्या दुखापतीमुळे दोन आठवडे बाहेर रहावे लागल्यानंतर रोहितने हैदराबादविरुद्ध पुनरागमन केले. पण, तो स्वस्तात बाद झाला होता. त्या पार्श्वभूमीवर धवन बोलत होता.
‘रोहित हा जागतिक स्तरावरील अव्वल दर्जाचा खेळाडू आहे. पण, त्याने बरेच सामने खेळलेले नाहीत. त्यामुळे, त्याच्या फॉर्मची मला कल्पना नाही. सहकारी या नात्याने माझ्या त्याला शुभेच्छा असतील. पण, प्रतिस्पर्धी या नात्याने आम्ही त्याचा फॉर्म खराब असेल तर त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करु’, असे आतापर्यंत 14 डावात 525 धावा जमवणाऱया डावखुऱया धवनने नमूद केले.
मागील 6 डावात 4, 0, 0, 7, 10 व 9 अशा अतिशय किरकोळ धावांवर बाद होणाऱया सहकारी सलामीवीर पृथ्वी शॉला देखील धवनने पाठबळ दर्शवले. ‘कोणताही एखादा खेळाडू प्रथमच बॅड पॅचमध्ये नाही आणि ही शेवटची वेळ देखील नाही. शॉला यातून बाहेर येण्यासाठी संयमावर भर द्यावा लागेल. याशिवाय, अजिंक्य रहाणेमुळे आमची फलंदाजी अधिक समतोल झाली असून त्याचा अनुभव पाठीशी असल्याने मी अधिक आक्रमक खेळू शकेन’, असे धवन शेवटी म्हणाला.