अर्जुन पुरस्कारासाठी निवडलेल्या 29 क्रीडापटूंत इशांत शर्माचाही समावेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा स्टार क्रिकेटपटू रोहित शर्मा, महिला मल्ल विनेश फोगट यांच्यासह एकूण चार खेळाडूंची देशाचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार राजीव गांधी खेलरत्नसाठी शिफारस करण्यात आली आहे. याशिवाय एकूण 29 क्रीडापटूंची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली असून त्यात क्रिकेटपटू इशांत शर्माचाही समावेश आहे.
महिला टेबल टेनिसपटू मनिका बात्रा आणि रिओ पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकणारा उंचउडीपटू मरिअप्पन थांगवेलू या अन्य दोन खेळाडूंची खेलरत्नसाठी शिफारस करण्यात आली आहे. क्रीडा मंत्रालयाने नियुक्त केलेल्या 12 सदस्यीय निवड समितीने या शिफारसी केल्या आहेत. या सर्वोच्च पुरस्कारासाठी चार खेळाडूंची शिफारस करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2016 मध्ये बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू, जिम्नॅस्ट दीपा कर्माकर, नेमबाज जितू राय, महिला मल्ल साक्षी मलिक या चौघांना मिळून हा पुरस्कार देण्यात आला होता. 33 वर्षीय रोहित शर्मा हा पुरस्कार मिळविणारा चौथा क्रिकेटपटू आहे. याआधी सचिन तेंडुलकर, त्यानंतर नुकताच निवृत्त झालेला महेंद्रसिंग धोनी व विद्यमान कर्णधार विराट कोहली यांना हा बहुमान मिळाला आहे. 1998 मध्ये हा पुरस्कार मिळविणारा पहिला क्रिकेटपटू होण्याचा मान तेंडुलकरने मिळविला होता. धोनीला 2007 आणि कोहलीला 2018 मध्ये या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. कोहलीला महिला वेटलिफ्टर मिराबाई चानूसमवेत हा पुरस्कार देण्यात आला होता.
भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या येथील मुख्यालयात पुरस्कार निवड समितीची बैठक झाली. या समितीत वीरेंद्र सेहवाग, माजी हॉकी कर्णधार सरदार सिंग यांसह अनेक माजी क्रीडापटूंचा समावेश आहे. विनेश फोगटने 2018 राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण आणि 2019 मधील आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक मिळविले होते. या कामगिरीचे तिला बक्षीस मिळाले आहे. मनिका बात्राने 2018 मध्ये शानदार प्रदर्शन करीत राष्ट्रकुलमध्ये सुवर्ण आणि आशियाई स्पर्धेत महिला एकेरीचे कांस्यपदक मिळविले होते.
इशांत शर्माची शिफारस
या निवड समितीने 29 क्रीडापटूंची अर्जुन पुरस्कारासाठी निवड केली असून त्यात इशांत शर्माचाही समावेश आहे. याशिवाय त्यांनी तिरंदाज अतानू दास, महिला हॉकीपटू दीपिका ठाकुर, कबड्डीपटू दीपक हुडा, टेनिसपटू दिविज शरण यांचीही शिफारस केली आहे. 31 वर्षीय इशांतने 97 कसोटी व 80 वनडेत भारताचे प्रतिनिधित्व करताना 400 आंतरराष्ट्रीय बळी मिळविले आहेत. ऑलिम्पिक कांस्य मिळविणारी मल्ल साक्षी मलिक व वर्ल्ड चॅम्पियन वेटलिफ्टर मिराबाई चानू यांचीही या समितीने अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली असल्याचे समजते. मात्र त्यांच्याबाबतचा अंतिम निर्णय क्रीडामंत्री किरेन रिजिजू घेणार आहेत. साक्षीला 2016 मध्ये तर मिराबाई चानूला 2018 मध्ये खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
राणा, फेलिक्स द्रोणाचार्यच्या शर्यतीत माजी नेमबाज जसपाल राणा व माजी हॉकीपटू ज्युड फेलिक्स यांची नावे प्रशिक्षकांना दिल्या जाणाऱया द्रोणाचार्य पुरस्कारांच्या शर्यतीत आहेत. जसपाल राणाला गेल्या वर्षी हा पुरस्कार नाकारण्यात आला होता. मनू भाकर व सौरभ चौधरी यांना त्याने मार्गदर्शन केले होते. पण या दोघांनीही जसपाल हे आपले प्रशिक्षक असल्याचा उल्लेख केला नव्हता. यासाठी त्यांना हा पुरस्कार नाकारण्यात आला होता. फेलिक्स यांनी ऑगस्ट 2017 मध्ये कनिष्ठ हॉकी संघाचे प्रशिक्षक म्हणून सूत्रे घेतली होती. पण संघाने निराशाजनक प्रदर्शन केल्याच्या कारणावरून हॉकी इंडियाने त्यांची या पदावरून हकालपट्टी केली होती.