रोहित शर्माला आगामी ऑस्ट्रेलिया दौऱयातून वगळले गेल्याचे निमित्त झाले आणि या निमित्ताने मुंबई इंडियन्स व बीसीसीआय यांच्यातील शीतयुद्धाचीच जणू झलक दिसून येत असल्याची चर्चा आहे. दि. 18 ऑक्टोबर रोजी किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध आयपीएल साखळी सामन्यादरम्यान डाव्या पायाला धोंडशिरेची दुखापत झाल्यानंतर रोहित शर्मा पुढील सलग दोन सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधीत्व करु शकला नाही. पण, या एकाच कारणामुळे रोहितला आगामी ऑस्ट्रेलिया दौऱयातून वगळले गेले का, हा प्रश्न तूर्तास अनुत्तरित आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा जलद गोलंदाज इशांत शर्मा हा दुखापतीमुळे उर्वरित आयपीएल हंगामातून बाहेर फेकला गेला होता. त्याचाही ऑस्ट्रेलिया दौऱयासाठी समावेश केला गेला नाही. पण, रोहित शर्माला वगळले जाणे अधिक चर्चेचा विषय ठरले आहे.
इशांत असो किंवा रोहित, त्यांच्या दुखापतीविषयी अधिक तपशील किंवा त्यांना यातून सावरण्यासाठी किती वेळ लागेल, याचा तपशील न देता बीसीसीआय सचिव जय शाह यांनी या उभयतांच्या प्रगतीवर बीसीसीआय वैद्यकीय पथकाचे लक्ष असेल, इतकेच नमूद केले. त्यामुळे, एकंदरीत निवडीतील निर्णयाविषयी गूढ निर्माण झाले आहे.