वृत्तसंस्था/ मँचेस्टर
संयुक्त अरब अमिरातमध्ये 19 सप्टेंबरपासून पासून आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील सुरू होणाऱया उर्वरित सामन्यात खेळण्यासाठी मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा, बुमराह आणि सुर्यकुमार यादव यांचे अबु धाबीत आगमन झाले.
भारतीय क्रिकेट संघ कसोटी मालिकेसाठी इंग्लंडमध्ये दाखल झाला होता. या मालिकेतील पाचवी आणि शेवटची कसोटी कोरोना समस्येमुळे रद्द करण्यात आली. इंग्लंडच्या दौऱयावर असलेले भारतीय संघातील खेळाडू दुबईच्या विविध भागामध्ये आयपीएल स्पर्धेसाठी दाखल होत आहेत.
मुंबई इंडियन्सतर्फे चार्टर विमानाची सोय करण्यात आली होती. या विमानातून शर्मा, बुमराह तसेच सुर्यकुमार यादव आपल्या कुटंबियासह शनिवारी सकाळी मँचेस्टर मधून हवाई प्रवासाने अबु धाबीत दाखल झाले. या तिन्ही क्रिकेटपटूंना आयपीएलच्या नियमानुसार अबु धाबीत सहा दिवसांसाठी क्वारंटाईनमध्ये रहावे लागणार आहे. अबु धाबीला प्रयाण करण्यापूर्वी या खेळाडूंची कोरोना चाचणी घेण्यात आली आणि सर्वजण निगेटिव्ह असल्याचे सांगण्यात आले.
अबु धाबीमध्ये पुन्हा या खेळाडूंची कोरोना चाचणी घेण्यात आली आणि ते निगेटिव्ह असल्याचे आढळून आले. मुंबई इंडियन्सचा आयपीएल स्पर्धेतील सामना 19 सप्टेंबर चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध होणार आहे. चेन्नई सुपरकिंग्स संघातील खेळाडू शनिवारी रात्रीपर्यंत दुबई दाखल होणार आहेत. आरसीबीतर्फे चार्टर विमानाची सोय करण्यात आली असून या विमानातून विराट केहली, मोहम्मद सिराज रविवार सकाळपर्यंत दुबईत दाखल होणार आहेत.