धोंडशिरेच्या दुखापतीतून मी आता पूर्ण सावरलो आहे, आता पूर्ण तंदुरुस्त आहे. त्यामुळे आजच्या लढतीत खेळताना पूर्ण जोमाने, ताज्या दमाने खेळेन, असा दृढ आत्मविश्वास मुंबई इंडियन्सचा नियमित कर्णधार व संघाच्या फलंदाजीचा भक्कम आधारस्तंभ रोहित शर्माने व्यक्त केला. रोहित यापूर्वी दोन आठवडय़ांच्या कालावधीत दुखापतीमुळे मुंबई इंडियन्स संघातून 4 सामन्यात खेळला नाही आणि याचदरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱयासाठी निवडल्या गेलेल्या भारतीय संघात त्याचा समावेश केला गेला नाही. पण, त्याचवेळी मुंबई इंडियन्सच्या सराव सत्रात तो पूर्ण क्षमतेने सहभागी झाला आणि यावरुन बरेच तर्कवितर्क मांडले गेले आहेत.
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये रोहित भारतीय क्रिकेट संघाचे उपकर्णधारपद सांभाळतो. आयपीएलमध्ये येथे पुनरागमन करताना त्याने सनराजयर्स हैदराबादविरुद्ध मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. या लढतीत तो केवळ 7 चेंडूच खेळू शकला. पण, यानंतर निर्णायक टप्प्यात त्याच्याकडून मुंबई इंडियन्सला विशेष अपेक्षा असणार आहेत.
‘पुनरागमन केल्याचा अर्थातच आनंद आहे. आणखी काही सामने आहेत, त्यात ताज्या दमाने मी खेळू शकेन, असा विश्वास वाटतो. धोंडशिर आता उत्तम आहे आणि मी पूर्वीप्रमाणे धडाकेबाज खेळू शकेन’, असे रोहित येथे म्हणाला. मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनानुसार, रोहितला दि. 18 ऑक्टोबर रोजी किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध डाव्या पायाला धोंडशिरेची दुखापत झाली होती. हैदराबादविरुद्ध नाणेफेकीसाठी आला असता त्याला तंदुरुस्तीविषयी विचारले गेले आणि त्यावेळी तो म्हणाला होता, मी आता पूर्ण तंदुरुस्त आहे. ताज्या दमाने मैदानात उतरु शकतो!