राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आयोजित तंदुरुस्ती चाचणीत उत्तीर्ण, सोमवारी ऑस्ट्रेलियाकडे प्रयाण
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताचा आघाडीचा फलंदाज रोहित शर्माने शुक्रवारी बेंगळुरातील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत तंदुरुस्ती चाचणी पार केली असून सोमवार दि. 14 रोजी तो ऑस्ट्रेलियाकडे प्रयाण करणार आहे. जागतिक कसोटी मानांकन यादीत अव्वलस्थानी असलेल्या कांगारुंविरुद्ध 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी 3 दिवस आधी तो ऑस्ट्रेलियन भूमीत दाखल होईल. मात्र, या मालिकेतील फक्त शेवटच्या दोन कसोटीसाठीच तो उपलब्ध असणार आहे.
यापूर्वी आयपीएल स्पर्धेदरम्यान झालेल्या धोंडशिरेच्या दुखापतीमुळे रोहित शर्माला सध्या सुरु असलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱयातील मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेत खेळता आले नव्हते. अगदी कसोटी मालिकेतील पहिल्या दोन कसोटीतही तो सहभागी होऊ शकणार नाही.
‘रोहित शर्माने तंदुरुस्ती चाचणी पार केली असून तो लवकरच ऑस्ट्रेलियाला रवाना होईल’, असे बीसीसीआयमधील सूत्राने गोपनियतेच्या अटीवर नमूद केले. रोहितची तंदुरुस्ती चाचणी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक राहुल द्रविड यांच्या देखरेखीखाली झाली. त्यांनीच रोहितला तंदुरुस्ती चाचणीत उत्तीर्ण झाल्याचा दाखला दिला.
14 दिवसांचे क्वारन्टाईन
ऑस्ट्रेलियन प्रशासनाच्या नियमानुसार, स्टार फलंदाज रोहितला 14 दिवसांच्या कडकडीत क्वारन्टाईनला सामोरे जावे लागणार असून त्यानंतरच तो शेवटच्या दोन कसोटी सामन्यांच्या पार्श्वभूमीवर सरावाला सुरुवात करु शकेल. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्या मालिकेतील शेवटचे दोन कसोटी सामने अनुक्रमे सिडनी (7 ते 11 जानेवारी) व ब्रिस्बेन (15 ते 19 जानेवारी) येथे खेळवले जाणार आहेत. रोहित शर्मा भारतातून थेट सिडनीकडेच प्रयाण करेल आणि एक आठवडाभर सरावाची संधी त्याला तेथे मिळेल.
साशंकतेची पार्श्वभूमी
यापूर्वी मागील काही आठवडय़ात रोहितच्या तंदुरुस्तीबद्दल बऱयाच साशंकतेचे वातावरण होते. दस्तुरखुद्द कर्णधार विराट कोहलीने रोहितच्या तंदुरुस्तीविषयी काहीच चित्र स्पष्ट नसल्याचे जाहीरपणे सांगितल्यानंतर याबद्दल चर्चेला अधिक ऊत आला होता. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सतर्फे खेळत असताना रोहितला दुखापत झाली आणि यानंतर मुंबईतर्फे 4 सामन्यातून तो बाहेर राहिल्यानंतर राष्ट्रीय निवड समितीने त्याचा ऑस्ट्रेलिया दौऱयासाठी विचार केला नव्हता. अर्थात, नंतर रोहित मुंबई इंडियन्स संघात परतला आणि त्याने आयपीएल जेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटाही उचलला. यामुळे त्याच्या तंदुरुस्तीविषयी आणखी चर्चा झडत राहिली.
मंडळाकडून स्पष्टीकरण
9 नोव्हेंबर रोजी बीसीसीआयने यातील काही चित्र स्पष्ट करताना रोहितला कसोटी मालिकेत पूर्ण तंदुरुस्त असावा, यासाठी निवडकर्त्यांनी मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेतून त्याला बाहेर ठेवले असल्याचे स्पष्ट केले. पण, मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचे उपकर्णधारपद भूषवत असलेला रोहित ऑस्ट्रेलियाला रवाना होण्याऐवजी मुंबईत आला. त्यानंतर विराट कोहलीने रोहितबाबत आणखी एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले. रोहितने ऑस्ट्रेलियातच पूर्ण तंदुरुस्त होण्यासाठी का प्रयत्न करु नयेत, असे विराट म्हणाला. त्यावेळी बीसीसीआयने 26 नोव्हेंबर रोजी आणखी एक पत्रक जारी केले आणि रोहित शर्मा आपल्या वडिलांच्या आजारपणामुळे मायदेशी परतला असल्याचे स्पष्ट केले.
भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेची रुपरेषा
तारीख / सामना / ठिकाण / भारतीय प्रमाणवेळ
17 ते 21 डिसेंबर / पहिली कसोटी (दिवस-रात्र)/ ऍडलेड / सकाळी 9.30 पासून
26 ते 30 डिसेंबर / दुसरी कसोटी / मेलबर्न / पहाटे 5 पासून
7 ते 11 जानेवारी / तिसरी कसोटी / सिडनी / पहाटे 5 पासून
15 ते 19 जानेवारी / चौथी कसोटी / ब्रिस्बेन / पहाटे 5 पासून.