वृत्त संस्था/ नवी दिल्ली
येत्या जुलै महिन्यात भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱयाबाबत भारतीय क्रिकेट मंडळाकडून शासनाच्या आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासाच्या निर्बंधामुळे अंतिम निर्णयासाठी विलंब केला जात आहे, असे मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. कोरोना महामारी संकटामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू आहे. दरम्यान सध्या तरी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.
कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेटचा जुलै महिन्याच्या उत्तरार्धात लंकेच्या दौऱयावर जाणार आहे. या दौऱयात उभय संघात तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळविले जाणार आहेत. कोरोना महामारी संकटामुळे या दौऱयाचे भवितव्य अधांतरी असल्याचे जाणवते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व क्रिकेट स्पर्धा तुर्ताला स्थगित किंवा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. कोरोना परिस्थितीमध्ये निश्चित सुधारणा केव्हा होईल याची खात्री देता येत नाही त्यामुळे शासनाकडून घालण्यात आलेले निर्बंध केव्हा शिथिल केले जातील याचा अंदाज नसल्याने भारतीय क्रिकेट मंडळाने आगामी लंका दौरा निर्णयाबाबत विलंब केला आहे. या दौऱया संदर्भात अद्याप मंडळाकडून कोणताच ठाम निर्णय घेण्यात आलेला नाही, असे मंडळाचे खजिनदार अरूण सिंग धुमाळ यांनी सांगितले. संपूर्ण देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा 31 मे रोजी संपणार आहे. त्यामुळे देशातील अंतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास करता येणार नाही. बांगलादेशचा संघ जुलै-ऑगस्ट दरम्यान तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी लंकेला जाणार आहे पण या दौऱया संदर्भात बांगलादेशही सावध असल्याचे सांगण्यात आले. मायदेशात होणाऱया इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकाविरूद्धच्या मालिका लंकन क्रिकेट मंडळाने यापूर्वीच लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे.