वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येत्या जुलैमध्ये भारतीय संघ मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी लंका दौऱयावर जाणार असून या संघाचे नेतृत्व शिखर धवन करण्याची शक्यता आहे. भारतीय संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेसाठी जाणार असल्याने व्हाईट बॉल क्रिकेटसाठी यातील खेळाडू उपलब्ध होऊ शकणार नाहीत. त्यासाठी नवा संघ सज्ज करण्याचा प्रयत्न बीसीसीआय करीत आहे.
लंकेला जाणाऱया संघात भुवनेश्वर कुमार, पृथ्वी शॉ, हार्दिक पंडय़ा, इशान किशन यांना स्थान दिले जाण्याची शक्यता आहे. या दौऱयात 3 वनडे व 3 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने होणार आहेत. 13 जुलैपासून ही मालिका सुरू होणार असून एकाच केंद्रावर यातील सामने खेळविले जाणार आहेत. या दौऱयाच्या योजनेबाबत अद्याप निश्चित काही सांगण्यात आलेले नसून तशी अधिकृत घोषणाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे राष्ट्रीय संघातर्फे मर्यादित षटकांच्या सामन्यात तसेच आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केलेल्या खेळाडूंना या दौऱयासाठी निवडले जाण्याची अपेक्षा आहे.
इशान किशन व सूर्यकुमार यादव यांनी मुंबई इंडियन्सतर्फे आयपीएलमध्ये चमकदार प्रदर्शन केले. तसेच इंग्लंडविरुद्ध मायदेशात झालेल्या व्हाईट बॉल मालिकेतही त्यांनी चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे त्यांची निवड निश्चित मानली जात आहे. आयपीएलच्या माध्यमातून पुढे आलेल्या युवा खेळाडूंत स्पिनर राहुल चहर, डावखुरा जलद गोलंदाज चेतन साकारिया यांनाही या संघात स्थान मिळू शकेल तसेच राहुलचा भाऊ दीपक चहरलाही संधी मिळू शकते. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना साकारियाने 7 सामन्यात 7 बळी मिळविले. आरसीबीचा सलामीवीर देवदत्त पडिक्कल या संघातील तिसरा सलामीवीर असेल. धवन व शॉ हे नियमित सलामीवीर असतील. निवड समिती सदस्यांशी या संदर्भात संपर्क साधला असता त्यांनी उत्तर देण्याचे टाळले आहे. मात्र शिखर धवन अनुभवी असल्याने त्याच्यावर नेतृत्वाची जबाबदारी सोपविली जाण्याची दाट शक्यता आहे.
वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, रिषभ पंत, अक्षर पटेल, केएल राहुल, शार्दुल ठाकुर हे 2018 मधील निदाहास ट्रॉफी स्पर्धेत भारताच्या टी-20 संघाचे सदस्य होते. पण हे सर्व आता कसोटी संघाचे सदस्य असल्याने ते इंग्लंडला संघासोबत जाणार आहेत. इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी व न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम लढत भारतीय संघ इंग्लंड दौऱयात खेळणार आहे.