वृत्तसंस्था/ कोलंबो
यजमान श्रीलंकेने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारताचा 2-1 अशा फरकाने पराभव केला. गुरुवारी येथे झालेल्या या मालिकेतील तिसऱया आणि शेवटच्या सामन्यात ‘सामनावीर’ हसरंगाच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर लंकेने भारतावर 7 गडय़ांनी विजय मिळविला. या सामन्यात भारताची कामगिरी अत्यंत निकृष्ट झाल्याने त्यांना मालिका गमवावी लागली. टी-20 प्रकारात लंकेचा हा भारतावर पहिलाच मालिका विजय आहे. यापूर्वी लंकेच्या दौऱयात भारताने वनडे मालिका 2-1 अशी जिंकली होती.
या शेवटच्या सामन्यात भारतीय संघाच्या तुलनेत लंकेची सर्वच विभागात कामगिरी सरस झाली. धवनच्या भारतीय संघाला तीन अंकी धावसंख्या गाठता आली नाही. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकात 8 बाद 81 धावा जमविल्या. यानंतर लंकेने 14.3 षटकात 3 बाद 82 धावा जमवित सामना आणि मालिका जिंकली.
भारताच्या डावामध्ये कुलदीप यादवने सर्वाधिक म्हणजे 28 चेंडूत नाबाद 23 धावा जमविल्या. कर्णधार धवन आणि सॅमसन यांना खातेही उघडता आले नाही. ऋतुराज गायकवाडने 2 चौकारांसह 14 तर भुवनेश्वर कुमारने 32 चेंडूत 16 धावा जमविल्या. फिरकी गोलंदाज हसरंगाने केवळ 9 धावांत 4 गडी बाद केले. शनाकाने 20 धावांत 2 तर चमिरा आणि रमेश मेंडीस यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना लंकेच्या डावात सलामीच्या अविष्का फर्नांडोने 18 चेंडूत 1 चौकारासह 12, भानुकाने 27 चेंडूत 1 चौकारासह 18, समरविक्रमाने 6, धनंजय डिसिल्वाने 20 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 23 आणि हसरंगाने 9 चेंडूत 1 चौकारासह नाबाद 14 धावा जमविल्या. भारतातर्फे राहुल चहरने 15 धावांत 3 गडी बाद केले.
या सामन्यात लंकेच्या अकिला धनंजयने भारतीय फलंदाजांना शेवटपर्यंत दमविले. त्याला एकही गडी बाद करता आला नाही. पण त्याने 4 षटकात केवळ 11 धावा दिल्या. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संघातील आठ खेळाडूंना आयसोलेशनमध्ये रहावे लागल्याने संघाचा समतोल पूर्णपणे विस्कळीत झाला. भारताकडून लंकेला केवळ 82 धावांचे आव्हान मिळाल्याने लंकेच्या फलंदाजांनी कोणतीही घाई न करता विजय मिळविला. ही खेळपट्टी सुरुवातीला बऱयापैकी वेगवान गोलंदाजांना साथ देत होती. पण त्यानंतर हसरंगाचे चेंडू चांगलेच वळत असल्याने भारतीय फलंदाजांना त्याला सामोरे जाणे कठीण झाले. भारताच्या डावात केवळ तीन फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली. नवोदित पडिक्कल आणि ऋतुराज गायकवाड यांच्याकडून निराशा झाली. लंकेच्या हसरंगाने आपल्या संघाला मालिका जिंकून देत आपला 24 वा वाढदिवस मोठय़ा थाटात साजरा केला.
संक्षिप्त धावफलक ः भारत- 20 षटकात 8 बाद 81 (कुलदीप यादव नाबाद 23, भुवनेश्वर कुमार 16, गायकवाड 14, हसरंगा 4-9, शनाका 2-20, चमिरा 1-16, मेंडीस 1-13), लंका- 14.3 षटकात 3 बाद 82 (धनंजय डिसिल्वा नाबाद 23, हसरंगा नाबाद 14, भानुका 18, आविष्का फर्नांडो 12, राहुल चहर 3-15).