वृत्तसंस्था /कोलंबो
लंकेच्या फिरकी गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱयामुळे तिसऱया व शेवटच्या वनडे सामन्यात भारताचा डाव 43.1 षटकांत 225 धावांत आटोपला. पृथ्वी शॉने सर्वाधिक 49 धावा जमविल्या तर लंकेच्या अकिला धनंजय व प्रवीण जयविक्रमा यांनी प्रत्येकी 3 बळी मिळविले. पावसाच्या व्यत्ययामुळे लंकेला विजयासाठी 227 धावांचे सुधारित उद्दिष्ट देण्यात आले.
भारताने या सामन्यात नितिश राणा, के. गौतम, राहुल चहर, चेतन साकरिया, व संजू सॅमसन या पाच खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात केवळ दुसऱयांदा पाच खेळाडूंनी वनडेमध्ये पदार्पण केले आहे. तीन सामन्यांची मालिका याआधीच जिंकली असल्याने संघव्यवस्थापनाने नव्याना संधी देण्याचा निर्णय घेतला. मात्र अननुभवामुळे या नवोदित खेळाडूंना लंकेच्या स्पिनर्ससमोर चांगले प्रदर्शन करता आले नाही. पावसामुळे 23 षटकानंतर खेळ थांबवावा लागला होता. नंतर हा सामना 47 षटकांचा करण्यात आला. भारताने प्रथम फलंदाजी करीत 43.1 षटकांत सर्व बाद 225 धावा जमविल्या. पृथ्वी शॉने सर्वाधिक 49, संजू सॅमसनने 46, सूर्यकुमार यादवने 40 धावा केल्या. याशिवाय हार्दिक पंडय़ाने 19, धवन व राहुल चहर यांनी प्रत्येकी 13, नवदीप सैनीने 15 धावा काढल्या.
संक्षिप्त धावफलक : भारत 43.1 षटकांत सर्व बाद 225 : शॉ 49 चेंडूत 49, सॅमसन 46, सूर्यकुमार यादव 40, सैनी 15, जयविक्रमा 3-59, अकिला धनंजय 3-44, चमीरा 2-55, करुणारत्ने 1-25, शनाका 1-33.