प्रतिनिधी/ पणजी
आमची लक्तरे काढणाऱयांचे आम्ही जाहीर स्वागत करतो. मुख्यमंत्र्यांनी ती काढूनच दाखवावी आणि सप्रमाण सिद्धही करावी, असे आव्हान आमदार रोहन खंवटे आणि सुदिन ढवळीकर यांनी दिले आहे.
ताळगाव येथे केलेल्या आक्रमक भाषणात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडताना दिगंबर कामत, सुदिन ढवळीकर, रोहन खंवटे आणि विजय सरदेसाई या चौघांना टार्गेट केले होते. त्या चौघांचीही लक्तरे आपण काढू शकतो, असे धक्कादायक विधानही त्यांनी केले होते. भाजपवर आरोप करण्याची धमक काँग्रेसमध्ये नाही, असा दावा करताना त्यांनी स्वतःच्या मंत्रिमंडळातील सदस्यांवर आपला पूर्ण विश्वास असल्याचे ठासून सांगितले होते. तीच ताकद आणि विश्वासाच्या बळावर आम्ही जनतेला सामोरे जाऊ शकतो, असेही ते म्हणाले होते. माननीय मोदीजींनी आम्हाला आत्मनिर्भर नवभारत निर्माण करण्याची हाक दिली आहे. त्यामुळेच अनेक संकटांचा सामना करत असतानाही आम्ही एवढय़ा मोठय़ा प्रमाणात काम करून राज्यशकट हाकत आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले होते.
सुमारे पाऊण तास केलेल्या आवेशपूर्ण आणि आक्रमक भाषणातील मुख्यमंत्र्यांच्या या धक्कादायक विधानांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. अशाप्रकारे विरोधकांची थेट नावेच घेऊन मुख्यमंत्र्यांनी केलेले सदर आरोप अनेकांच्या पचनीही पडले नव्हते. त्याचबरोबर दिगंबर, सुदिन, रोहन आणि विजय यांची अशी कोणती ही गुपिते मुख्यमंत्र्यांजवळ आहेत ज्यामुळे सर्वांचीच लक्तरे काढण्याची भाषा मुख्यमंत्री बोलत आहेत, अशी चर्चाही दिवसभरात सुरू होती.
मुख्यमंत्र्यांनी लक्तरे काढावीच ः खंवटे
या आरोपाबद्दल आमदार रोहन खंवटे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, मुख्यमंत्र्यांनी अवश्य आमची लक्तरे काढावी. त्यांचे आम्ही स्वागत करतो, असे जाहीर आव्हान त्यांनी दिले.
गत अडीच वर्षांपासून मुख्यमंत्री सरकार चालवत आहेत. त्या दरम्यान त्यांच्या विरोधात आम्ही अनेकदा आवाज उठवत आहोत. विधानसभेत तर आम्हीच त्यांची लक्तरे काढलेली आहेत. त्यामुळे ते प्रचंड तणावाखाली आले असून अशा नैराश्यपूर्ण स्थितीत कोणतीही विधाने करतात, अशी टीका खंवटे यांनी केली.
लक्तरे काढाच, पण सिद्धही करा ः ढवळीकर
आम्ही काही वाईट केले असेल तर मुख्यमंत्र्यांनी अवश्य लक्तरे काढावी. मात्र आरटीआयमार्फत ती सिद्धही करून दाखवावी, असे आव्हान आमदार सुदिन ढवळीकर यांनी दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी ज्या कार्यक्रमात लक्तरे काढण्याचे वक्तव्य केले तो भाजपचा खासगी कार्यक्रम होता. अशा कार्यक्रमात ते काहीही बोलू शकतात. तरीही लक्तरे काढण्याएवढी अशी कोणती भानगड आम्ही केली आहे ते मुख्यमंत्र्यांनी दाखवून द्यावे, आम्ही त्यांचे स्वागत करू, असेही ढवळीकर म्हणाले.
कोणत्याही योजनेचे श्रेय घेण्यासाठी आम्ही हपापलेलो नाही. मोफत पाणी देण्यासंबंधीची कल्पना आपणच मांडली होती. तीच कल्पना मुख्यमंत्र्यांनी उचलली आणि लागू केली. हवे तर सर्व योजनांचे श्रेय त्यांनीच घ्यावे, असा टोला ढवळीकर यांनी लगावला. कुणावरही आरोप करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या अधिकाऱयांकडून संपूर्ण माहिती मिळवावी, इतिहास जाणून घ्यावा व नंतरच बोलावे, अज्ञानातून बोलू नये, असा सल्लाही ढवळीकर यांनी दिला.
अमित शहांसमोर मुख्यमंत्री तोंडघशी
दरम्यान, ताळगाव येथे भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या सहकारी मंत्र्यांवर पूर्ण विश्वास व्यक्त करणाऱया जोशपूर्ण भाषणातील शब्द हवेत विरतात न विरतात तोच त्यांचेच ज्येष्ठ सहकारी मंत्री माविन गुदिन्हो यांनी मुख्यमंत्री कोणत्याही निर्णयात आम्हाला विश्वासात घेत नाहीत, अशी खंत थेट गृहमंत्री अमित शहा यांच्याकडेच व्यक्त केल्यामुळे मुख्यमंत्री तोंडघशी पडले आहेत.
मुख्यमंत्र्यांवर एकाधिकारशाहीचे आरोप
मुख्यमंत्र्यांचे हे आवेशपूर्ण भाषण हवेत विरते न विरते तोच विरोधक बाजूलाच राहिले आणि खुद्द सहकारी मंत्र्यांनीच त्यांच्यावर एकाधिकारशाहीचे आरोप केले. सदर बैठकीत शहा यांनी प्रत्येकाला बोलण्याची संधी दिली होती. माविन यांनी तिचा पुरेपूर फायदा उठवताना मुख्यमंत्री आमचे ऐकत नाहीत, आम्हाला विश्वासातही घेत नाहीत, आमची कामेही करत नाहीत, स्वतःच्या मर्जीने सरकार चालवतात, असे कैक दोषारोप केले. एखादे विरोधक शोभावे अशा थाटात बोलताना गुदिन्हो यांनी मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी ‘सरकार तुमच्या दारी’, ‘स्वयंपूर्ण गोवा’ या कार्यक्रमावरही टीका केली. आपल्या आजवरच्या राजकीय प्रवासातील अनुभवावरून आपण हे बोलत असल्याचेही त्यांनी शहा यांना सांगितले.
इतरांनीही केली असंतोषास वाट मोकळी
याच निमित्ताने मंत्री विश्वजित राणे आणि मंत्री मायकल लोबो यांनीही मुख्यमंत्र्यांबद्दल खदखदणाऱया असंतोषास वाट मोकळी करून देण्याची संधी घेतली. हा सर्व प्रकार भाजप कोअर टीमच्या बैठकीत शहा आणि सावंत यांच्या उपस्थितीतच घडल्यामुळे मुख्यमंत्र्यांवर अचंबित होण्याची वेळ आली.