पंजाबचे मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँगेस नेते कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी आपल्या पदाचा त्याग केला आहे. हे कधी ना कधी होणारच होते. गेले वर्षभर तसे स्पष्ट संकेत मिळत होते. पंजाब काँगेसमध्ये धुमसणाऱया संघर्षाला केव्हा ना केव्हा वाचा फुटणारच होती. तथापि, पक्षांतर्गत संघर्षाची ही लक्तरे विधानसभा निवडणूक अवघी सहा महिन्यावर आली असताना वेशीवर टांगली जावीत, यातून काँगेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाच्या अकार्यक्षमतेचे आणि अतर्क्य कार्यपद्धतीचे जे दर्शन घडले ते या पक्षाला महागात पडणार आहे. स्वातंत्र्यानंतरच्या 74 वर्षांपैकी तब्बल 60 वर्षे देशावर अधिराज्य गाजवलेल्या काँग्रेस नामक पक्षाची आज जी दशा झाली आहे, ती त्या पक्षाच्या कट्टर विरोधकांनाही थक्क करून सोडणारी आहे, तर ‘काँगेसमुक्त भारत’ हा भारतीय जनता पक्षाने दिलेला राजकीय नारा काँगेस पक्षच खरा ठरविणार की काय, असा प्रश्न विचारण्याची वेळ काँगेसच्या समर्थकांवर आली आहे. हा प्रश्न केवळ एका मुख्यमंत्र्याला पदावरुन हटविण्यापुरता मर्यादित नाही, तर काँग्रेसच्या एकंदर व्यवस्थापनाचीच जी दुर्दशा झाली आहे, तिचे प्रत्यंतर यातून येते. कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी गेल्यावेळी अकाली दलाचा मोठा पराभव करून पंजाबमध्ये काँगेसला स्वबळावर सत्तेवर आणले. त्यांचे नेतृत्व नसते, तर त्याचवेळी काँगेसला पंजाब गमवावा लागला असता, असेही मत राजकीय अभ्यासकांनी व्यक्त केले होते. अमरिंदरसिंग आणि राहुल गांधी यांच्यातून गेली कित्येक वर्षे विस्तव जात नाही हे उघडे गुपित आहे. तथापि, त्यांना हात लावण्याची काँगेस श्रेष्ठींची तयारी नव्हती. आता पंजाबमध्ये काँगेसला कदाचित सत्ता मिळणार नाही, अशी निवडणूकपूर्व सर्वेक्षणे प्रसिद्ध होत असताना हा नेतृत्वबदलाचा निर्णय घेण्यात आला. याचाच अर्थ असा की, काँगेसच्या सर्वोच्च नेतृत्वाचा जमिनीवरील परिस्थितीशी संपर्क तुटला आहे. अमरिंदरसिंग यांची कामगिरी समाधानकारक नव्हती, हे त्यांना हटविण्याचे कारण असेल तर त्याची कल्पना सर्वोच्च नेतृत्वाला आधीच यावयास हवी होती आणि नेतृत्व परिवर्तनाचा निर्णय किमान एक वर्षभर आधी होणे आवश्यक होते. तसे झाले असते तर नव्या मुख्यमंत्र्याला सुस्थापित होण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला असता आणि त्याचा लाभ काँगेसला होण्याची शक्यता होती. तथापि, विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना अमरिंदरसिंग यांच्यासारखा नेता गमावण्याची वेळ येण्यातून काँगेसच्या भोंगळ आणि गलथान कारभारावर प्रकाश पडतो. गेली जवळपास दोन वर्षे काँगेसला पूर्णवेळ अध्यक्ष नाही. सोनिया गांधी कार्यकारी अध्यक्षा आहेत आणि त्यांच्या प्रकृतीबद्दलही बरेच काही बोलले जाते. राहुल गांधींनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. ते आजही पूर्णवेळ अध्यक्ष होण्यास तयार नाहीत. प्रियांका गांधी या केवळ निवडणूक जवळ आली की सक्रीय होतात. त्यामुळे त्यांचा फारसा उपयोग नाही. तसेच नेहरू-गांधी घराण्यातील सदस्य वगळता अन्य कोणाकडे (तो कितीही कर्तृत्ववान असला तरी) पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व देण्याची काँगेसची पद्धत नाही. यामुळे या पक्षाची प्रचंड कोंडी होत आहे. काँगेस हा कार्यकर्ता आधारित पक्ष नसून नेता आधारित आहे. त्यामुळे या पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व ढेपाळले की स्थानिक नेते एकतर निष्क्रीय होतात किंवा एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी आक्रमक होतात. त्यांच्यावर सर्वोच्च नेतृत्वाचे जे नियंत्रण असावयास हवे, ते नसल्यामुळे अनागोंदी माजली आहे. पंजाबमध्ये असेच घडत आहे. अमरिंदरसिंग यांच्याविरोधात नवज्योतसिंग सिद्धू यांनी शड्डू ठोकला आहे. सिंग यांनीही माघार घेण्यास नकार दिल्याने गटबाजी पराकोटीला पोहचली. सर्वोच्च नेतृत्वाने दोन्ही गटांना चुचकारण्याचा प्रयत्न केला. पण मुळात तेच नेतृत्व दुर्बळ असल्याने दोन्ही गटांनी त्याच्या प्रयत्नांना दाद न देता एकमेकांशी संघर्ष सुरूच ठेवला. परिणाम असा झाला की अगदी अवघड वेळेला मुख्यमंत्र्यांना हटविण्याची वेळ आली. सध्या राहुल गांधी सिद्धू यांच्या बाजूचे आहेत. त्यामुळे त्यांच्या गटाचे पारडे जड आहे, असे बोलले जाते. पण अमरिंदरसिंग यांनी सिद्धूंवर जे आरोप ठेवले आहेत, ते पाहता सिद्धूंवर लोक कितपत विश्वास ठेवतील हे सांगता येणे कठीण आहे. सिद्धू यांचे पाकिस्तानच्या भारतविरोधी नेतृत्वाशी लागेबांधे आहेत आणि ते देशहिताच्या विरुद्ध वर्तणूक करीत आहेत, असा गंभीर आरोप अमरिंदरसिंग यांनी पद सोडल्यानंतर केला. सिद्धूंच्या नेतृत्वात पुढची निवडणूक लढविली गेल्यास आपण कडाडून विरोध करू. पाकिस्तानच्या गळय़ात पडलेल्या सिद्धूंमुळे काँगेसची प्रतिमा मलीन होईल, असा इशारा अमरिंदरसिंग यांनी दिला आहे. या आरोप प्रत्यारोपांमुळे पंजाबमध्ये काँगेस आतून पोखरली जात आहे. पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व या घडामोडींकडे अगतिकपणे पहात आहे. ज्या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्यात पंजाब हे एकच राज्य काँगेसकडे आहे. ते टिकविण्यासाठी सर्वोच्च नेतृत्वाने वेळीच सावध होऊन पावले टाकावयास हवी होती. तसे न झाल्याने एकोप्याची लक्तरे झाली आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणुकीत यश मिळण्याची शक्यता अधिकच दूर झाली आहे. हे राज्यस्तरीय नेतृत्वाचे अपयश आहे, त्याहीपेक्षा जास्त सर्वोच्च नेतृत्वाचे आहे. अशीच स्थिती आज या पक्षाची जवळपास प्रत्येक राज्यात आहे. लवकरात लवकर ती न सुधारल्यास पक्षाचे भवितव्य कठीण आहे. वेळ निघून जाण्याच्या आत निर्णायक पावले न उचलल्यास स्थिती ‘बुडत्याचा पाय खोलात’ अशी होईल.
Previous Article…तेच माझे स्वतःचे घर होते
Next Article परदेशी पर्यटकांना लवकरच भारताची द्वारे होणार खुली
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.