अयोध्येत दीपोत्सव- गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये होणार नोंद
वृत्तसंस्था / अयोध्या
दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर भगवान श्रीरामाची नगरी अयोध्येत विक्रमी दीपोत्सव पार पडला आहे. अयोध्येत 12 लाख दिवे प्रज्ज्वलित करण्यात आले. दीपोत्सवापूर्वी तेथे शोभायात्रा काढण्यात आली. तर केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येतील दीपोत्सवाच्या कार्यक्रमाचे निरीक्षण केले आहे. होलोग्राफिक लाइटद्वारे रामकथा उपस्थितांना ऐकविण्यात आली आहे.
अयोध्येला नववधूप्रमाणे सजविण्यात आले आहे. अयोध्येत दीपोत्सवाचा कार्यक्रम दरवर्षी नवी उंची गाठत आहे. भगवान श्रीरामाच्या भव्य मंदिराच्या उभारणीसोबत तेथे पर्यटनाच्या संधी वेगाने वाढणार आहेत. उत्तरप्रदेश सरकार केंद्र सरकारच्या पावलावर पाऊल ठेवत याकरता निरंतर कार्य करत असल्याचे मुख्यमंत्री योगींनी म्हटले आहे. अयोध्येत भव्य दीपोत्सवाकरता अवध विद्यापीठाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी राम की पैडी येथे आकर्षक रांगोळी रेखाटली आहे.
12 लाख दिवे पेटविण्यासाठी 36 हजार लिटर तेलाचा वापर झाला आहे. यात राम की पैडी येथे 9 लाख आणि अयोध्येच्या उर्वरित भागांमध्ये 3 लाख दीप प्रज्ज्वलित करण्यात आले. तर रामजन्मभूमी परिसरात 51 हजार दिवे लावण्यात आले. यंदा दिव्यांची गणना करण्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सचे पथकही पोहोचले होते.
अयोध्येत 30 ऑक्टोबर आणि 2 नोव्हेंबर 1990 रोजी रामभक्तांवर क्रूरपद्धतीने गोळय़ा झाडण्यात आल्या होत्या. परंतु पुढील कारसेवा होईल तेव्हा गोळी चालविली जाणार नाही. रामभक्त आणि कृष्णभक्तांवर पुष्पवर्षाव होणार आहे. पूर्वीच्या सरकारच्या काळात कब्रस्तानची भिंत निर्माण करण्यासाठी निधी खर्च व्हायचा. पण आता मंदिरांची पुनउ&भारणी आणि सौंदर्यीकरणावर निधी खर्च होत असल्याचे उद्गार योगींनी काढले आहेत.
विविध देशांचे राजदूत उपस्थित
भगवान राम, माता सीता, भगवान लक्ष्मण यांची भूमिका साकारणारे कलाकार हेलिकॉप्टरद्वारे अयोध्येत पोहोचल्यावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्व कलाकारांना ओवाळून पुष्पहार घातले. व्हिएतनाम, केनिया, त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या राजदूतांनी कलाकारांच्या राजतिलकमध्ये भाग घेतला होता.
सर्वाधिक पर्यटनाची नगरी
दीपोत्सव कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत 661 कोटी रुपयांच्या 50 प्रकल्पांचे लोकार्पण केले आहे. अयोध्या जगातील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटनाच्या नगरीपैकी एक ठरणार आहे. भगवान श्रीरामाबद्दल श्रद्धा ठेवणारे पर्यटक दरवर्षी अयोध्येत येतात. लवकरच भगवान श्रीराम यांचे भव्य मंदिर उभे राहणार असल्याचे केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांनी म्हटले आहे.
मार्चपर्यंत मोफत धान्य
पंतप्रधान मोफत धान्य योजना नोव्हेंबरपर्यंत आहे. अद्याप कोरोना संकट संपलेले नसल्याने राज्य सरकारने ही योजना होळीपर्यंत लागू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अंत्योदय कार्डधारकाला आम्ही 35 किलो धान्य डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चमध्ये मोफत देऊ असे योगी म्हणाले.