प्रतिनिधी/ सातारा
खासदार उदयनराजे यांच्या प्रयत्नातून सर्वांसाठी घरे या योजनेतुन युआयडीएसएमटीअंतर्गत पाठीमागे घरकुले शहरात बांधण्यात आली. त्यामध्ये सदरबझार येथील लक्ष्मीटेकडीवरील घरकुल अजूनही पूर्ण झालेले नाही. घरकुलाचे काम हाती घेतलेल्या बीव्हीजी या कंपनीने हे काम करण्यामध्ये अतिशय दिरंगाई केली जात आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळत नाही.काही घरकुलांना दारे खिडक्या नाहीत, तर काही घरकुलांना अजूनही विजेचे कनेक्शन नाही, पाणी नाही, अशी अवस्था असताना संबंधित कंपनी अन्य ठिकाणी कामे करते आहे, घेतलेले काम पूर्ण क्षमतेने केले जात नाही, असा आरोप नगरसेवक विशाल जाधव यांनी केला आहे.
सातारा शहरात झोपडपट्टीतील नागरिकांना हक्काचे घर मिळावे यासाठी खासदार उदयनराजे यांनी युआयडीएसएमटी योजनेतून घरकुल योजना आणली होती. त्यामध्ये सदरबझार येथे भिमाबाई आंबेडकर झोपडपट्टी येथे घरकुलांचा वापर सुरु झाला.शनिवार पेठ, मंगळवार पेठेतही घरे लाभार्थ्यांना देवून तेथे राहण्यास सुरुवात केली गेली. परंतु लक्ष्मी टेकडीवरचा प्रश्न अजून सुटता सुटत नाही. अर्धवटच अवस्थेत घरकुलाचे काम आहे. काही विंगमध्ये अजूनही दरवाजे खिडक्या गायब आहेत. वरच्या मजल्यावरील काही ठिकाणी लाइं&ट नाही तर काही ठिकाणी पाणी नाही. बीव्हीजी ग्रुपने हे काम हाती घेतले असून त्या कंपनीकडून योग्य पद्धतीने काम होत नाही. हे काम अर्धवटच ठेवून अन्य ठिकाणी कंपनीने काम घेतले गेले आहे. त्यामुळे या कामाकडे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप नगरसेवक विशाल जाधव यांनी केला आहे. याबाबत पालिकेच्या बांधकाम विभागात चौकशी केली असता ती कंपनी काम करत आहे, असे सांगण्यात आले.