प्रतिनिधी/ सातारा
शहरातील सगळय़ात मोठी झोपडपट्टी म्हणून लक्ष्मी टेकडीकडे पाहिले जाते. या झोपडपट्टीत अगदी परराज्यातील नागरिकही स्थायिक झालेले आहेत. येथील नागरिकांना स्वतःच्या परिसराची स्वच्छता राखली पाहिजे, कोरडा पाळला पाहिजे, असे वारंवार जिल्हा हिवताप कार्यालयाकडून सांगण्यात येते. परंतु या कार्यालयाच्या सुचनांना केराची टोपली दाखवली जाते. जिल्हा हिवताप कार्यालयाच्या पथकाने सर्व्हे केला होता. 70 पैकी 19 घरात तपासणी केली. त्यापैकी 147 पैकी 34 जणांच्या ठिकाणी डेंग्यूच्या आळय़ा आढळून आल्या.
येथील डेंग्यू काही हटेना अन् आळय़ा काही जाईनात अशी अवस्था सध्या लक्ष्मी टेकडीवरील पाण्याच्या टाकीच्या खालील झोपडय़ात दिसून येत आहे. याच परिसरात पालिका कर्मचाऱयांची वसाहत आहे तेथेही तीच अवस्था आहे. नगरसेवक विशाल जाधव हे लक्ष घालतात परंतु स्थानिक नागरिकांचीही तेवढीच जबाबदारी आहे.
लक्ष्मी टेकडीवर विविध समाजाचे नागरिक रहातात. हातावर पोट असलेले हे नागरिक असून आपल्या कुडमेडाच्या पत्र्याच्या घरात राहतात. बाजूने गटर, बाजूला डुकरांचा सुळसुळाट तर पाठीमागे मोकळय़ा जागेत पडलेला कचरा सर्व वातावरणच आरोग्याची हानी पोहचवणारे असे आहे. गेल्या एक महिन्यात तब्बल दोन वेळा या परिसरातील नागरिकांनी डेंग्यू, चिकनगुन्यासारख्या साथरोगाने पछाडले गेले. तेथील स्थानिक नागरिकांनी जर हिवताप कार्यालयाकडून दिलेले नियम पाळले तरीही काही अंशी प्रमाण आटोक्यात येईल असे सांगण्यात येते. पाण्याच्या टाकीच्या खाली गेल्या दोन दिवसांपूर्वी रुग्ण आढळून आल्याचे समजताच नगरसेवक विशाल जाधव यांनी या परिसरातील सर्वच ठिकाणी आरोग्य विभागाकडून डीडीटी पावडर टाकून घेतली. जिल्हा हिवताप कार्यालयाच्या पथकाने सर्व्हे केला होता. 70 पैकी 19 घरात तपासणी केली. त्यापैकी 147 पैकी 34 जणांच्या ठिकाणी डेंग्यूच्या आळय़ा आढळून आल्या. हे आळय़ांचे प्रमाण 27.1 इतके आहे. पथकाने दिलेल्या सुचनांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, अशी माहिती हिवताप कार्यालयातून दिली गेली पाहिजे.