ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोना महामारीमध्ये यासोबतच पूरपरिस्थितीमध्ये राज्यातील वीज कामगारांनी जीव धोक्यात घालून कार्य केले आहे. मात्र व्यवस्थापनाकडून कामगारांना दिवाळी बोनस दिलेला नाही. याचा निषेध म्हणून राज्यातील सर्व वीज कामगार, अधिकारी 14 नोव्हेंबरला म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एक दिवसाचा संप करणार असल्याचा इशारा तिन्ही वीज कंपन्यांमध्ये कार्यरत कर्मचारी, अधिकारी, अभियंता संघटनेकडून देण्यात आला आहे.
महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या तीन वीज कंपन्यांमध्ये काम करणारे कामगार, अभियंते, अधिकारी, सहाय्यक संघटनांनी बोनस देण्याच्या मागणीसंदर्भात हा इशारा दिला. तिन्ही प्रशासनांनी बोनस व पगारवाढीचा दुसरा हप्ता देण्याचा निर्णय न घेतल्याने राज्यातील 86 हजार वीज कामगार 14 नोव्हेंबरला संपावर जाणार आहेत.
कर्मचारी संपावर जाणार नाहीत असा मला विश्वास : नितीन राऊत
दरम्यान, या कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत बोलताना ऊर्जा मंत्री नितीन राऊत म्हणाले की, सरकारला वीज कर्मचाऱ्यांच्या अडचणीची जाणिव आहे मात्र, आज तरी सहकार्य करणे योग्य ठरणार नाही. पण, योग्यवेळी त्यांची निश्चितपणे त्याची पूर्तता केली जाईल. तसेच हे कर्मचारी संपावर जाणार नाहीत, आधी माझ्याशी चर्चा करतील आणि मग निर्णय घेतील असा विश्वासही यावेळी नितीन राऊत यांनी व्यक्त केला.