गैरसोयीचा अभाव, ठेकेदारामुळे लाभार्थ्यांना मिळेना सुविधा
प्रतिनिधी/ सातारा
येथील झोपडपट्टी वासियांना चांगले पक्के घर देण्यासाठी खासदार उदयनराजे यांच्या प्रयत्नाने एकात्मिक बाल विकास योजने अंतर्गत 2011 मध्ये घरकुल प्रकल्प सुरू करण्यात आला. या प्रकल्पा अंतर्गत अजून सदर बाजार परिसरातील लाभार्थ्यांना घर मिळाली नाहीत, काहींना घर मिळाले पण सुविधा नाहीत, असा सावळागेंधळ असून याचे कामकाज पाहणाऱया बीव्हीजी कंपनीवर कारवाई करण्याची मागणी नगरसेवक विशाल जाधव यांनी केली आहे.
सातारा शहरात असलेल्या 21 झोपडपट्टीमधील नागरिकांना चांगले घर मिळावे, या उदात्त हेतूने एकात्मिक गृह निर्माण प्रकल्पामधून खासदार उदयनराजेंनी 2011 मध्ये मंजुरी आणली. त्या कामाला 2013 मध्ये सुरुवात झाली. प्रकल्पाची किंमत 34 कोटी 70 लाख एवढी होती. 1 हजार 473 घरे 21 कोटी 70 लाखात बांधून पूर्ण करावयाची तर पायाभूत सुविधांसाठी 13 कोटी निधी होता. आठ ठिकाणी हे घरकुल उभारण्याचे काम झाले. लाभार्थी 30 हजार रुपये भरून त्यांना घर मिळणार होते. सगळ्यात जास्त लाभार्थी हे सदरबाजार येथील लक्ष्मी टेकडी येथे आहेत. 510 लाभार्थी असून प्रत्येकांनी 30 हजार रुपये घरासाठी दिले आहेत. मात्र, काहींना अजून घरे नसून बांधलेली घरे तशीच आहे. स्वच्छतेचा अभाव दिसत आहे.
बीव्हीजीला काळ्या यादीत टाका
लाभार्थ्यांना आपल्या हक्काचे घर मिळाले पाहिजे. त्यांनी कष्ट करून पैसे भरले आहेत. असे असताना घरात सुविधा नाहीत. लाईट, पाणी नाही. मेंटन्सचे काम करणाऱया बीव्हीजी या कंपनीकडून नेटके काम होत नाही. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करून काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक विशाल जाधव यांनी केली आहे.