समस्येकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष : कायमस्वरुपी उपाय-योजना राबविण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
लक्ष्मी टेकडी, पाईपलाईन रोड येथील सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक उपाय-योजना राबविण्यात आल्या नसल्याने वाहनधारकांना नाहक त्रास होत आहे. येथील समस्या निवारणासाठी पाईप घालण्यात आली होती. पण काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे येथील समस्या कायमस्वरुपी सोडविण्याची मागणी होत आहे.
लक्ष्मी टेकडी पाईपलाईन रोड येथील पेट्रोलपंपशेजारी साचणाऱया सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. सांडपाणी जाण्यासाठी बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतीने तातडीने पाईप घातल्या. पण सदर पाईप लहान आकाराच्या तसेच तांत्रिकदृष्टय़ा व्यवस्थित घातल्या नसल्याने सांडपाण्याचा निचरा होत नाही. परिणामी या ठिकाणी पाणी साचून रामघाट रोडवरून वाहत आहे. या रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. तसेच समोर बसथांबा असल्याने प्रवाशांची गर्दी नेहमी असते. त्याचप्रमाणे या परिसरात रिक्षास्थानक असल्याने वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. अशातच सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याने पादचारी आणि दुचाकी वाहनधारकांना नाहक त्रास होत आहे. परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. रस्त्यावरून वाहणारे सांडपाणी पादचारी व दुचाकी वाहनधारकांच्या अंगावर उडत असल्याने मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
हा भाग ग्रामपंचायत हद्दीत येत असल्याने यापूर्वी ग्रामपंचायतीने पाईप घालून समस्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न केला होता. पण हे काम व्यवस्थित झाले नसल्याने ही समस्या जैसे थे आहे. येथील समस्येची पाहणी करून तातडीने कायमस्वरुपी उपाय-योजना राबविण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.