प्रतिनिधी/ सातारा
जिल्हा बँकेच्या 10 जागांसाठी 20 उमेदवारांचे नशिब मतपेटीत बंद झाले असून ते मंगळवारी सकाळी 8 वाजता खुलणार आहे. मतमोजणीला मंगळवारी सकाळी सुरुवात होणार आहे. बारा वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येणार असून गुलाल कोणाच्या अंगावर उडणार हे मंगळवारी पहायला मिळणार आहे. दरम्यान, निकालामध्ये जावली, खटाव, पाटण, कराड आणि माण या तालुक्यांच्या निकालाकडे सगळयांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. दरम्यान, जिंकणार कोण यावर पैजा लागल्या आहेत. मतमोजणी जरंडेश्वर नाक्यावरील बँकर्सच्या हॉलमध्ये होणार आहे.
जिल्हा बेँकेच्या 10 जागांसाठी अगदी चुरशीने मतदान झाले असून मतमोजणीची तयारी निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळी यांनी केलेली आहे. सकाळी 8 वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. 11 टेबलवर 11 सोसायटीकरता ही मतमोजणी प्रथम हाती घेण्यात येणार आहे. त्याकरता सुमारे 60 कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत. सोसायटी मतदार संघाची मतमोजणी झाल्यानंतर बँकर्स मतदार संघाची मतमोजणी होणार आहे. त्यानंतर महिला अणि मागासवर्गीय मतदार संघाची मतमोजणी करण्यात येणार आहे. सर्व मतमोजणी दुपारी 12 वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलीस बंदोबस्त सुरक्षितता म्हणून ठेवण्यात आलेला आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळी यांनी दिली आहे.
पैजा लागल्या, गुलाल आमचाच
इतर निवडणुकांप्रमाणे काही तज्ञ मंडळींनी सोशल मीडियावर अंदाज बांधून मोकळे झाले तर काहींनी आपलाच उमेदवार निवडणूक येणार, आपलेच पॅनेलचे उमेदवार विजयी होणार अशा आशयाच्या पैजा लावल्या आहेत. पैजा लावल्याने नेमका गुलाल कोणाच्या अंगावर पडणार हे खरे चित्र उद्याच पहायला मिळणार आहे.
जावलीमध्ये काय होणार?
जावली तालुक्याला शांतता हवी असेल तर शशिकांत शिंदे यांचाच विजय व्हावा एका मतांनी तरी व्हावा, असे जाणकार जावलीकर म्हणत आहेत. परंतु गेल्या महिन्याभरात सुरु असलेल्या घडामोडीवरुन निकाल नेमका काय लागू शकतो हे समजू शकत नाही. जावलीकरांसह जिल्हावासियांच्या नजरा लागुन राहिल्या आहेत.
दोन्ही मंत्र्यांच्या निकालाकडे लक्ष
माजी सहकार मंत्री स्व. विलासकाका यांचे सुपूत्र ऍड. उदयसिंह उंडाळकर हे त्यांच्या हक्काच्या कराड सोसायटी मतदार संघातून उभे राहिले असले तरीही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या साथीला भाजपाचे डॉ. अतुल भोसले होते. तसेच पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनीही भावनिक वातावरण केले होते. तसेच ऍड. उदयसिंह उंडाळकर यांनी भावनिक वातावरण केले होते. परंतु कराड तालुक्यातील ऊस पट्टय़ातील राजकारण हे भावनेवर चालत नाही तर तिथली गणिते वेगळीच असतात. त्यामुळे निकाल नेमका काय असू शकेल हेही उद्याच समजेल. तसेच राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे जरी मंत्री असले तरीही माजी बांधकाममंत्र्यांचे चिरंजीव सत्यजितसिंहांची पाटण तालुक्यामध्ये एक वेगळीच क्रेझ आहे. तेथे पक्षीय राजकारण चालत नाही तर गटातटाचे आणि आळीचे राजकारण चालते त्यामुळे बहुतांशी विकास सेवा सोसायटय़ांवर ही पाटणकर गटाची सत्ता आहे तर दुसऱया बाजूला मंत्री त्यामुळे नेमका निकाल काय लागेल हे उद्याच समजेल.
खटाव, माणकडेही नजरा
खटावमध्ये सहकार पॅनेलचे नंदकुमार मोरे हे जेथे जाईल तेथे विजय मिळवणार आणि पद खेचून आणण्यात पटाईत आहेत तर त्यांच्या विरोधात कारागृहातून लढत असलेले राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गे हेही मुरबी राजकारणी आहेत. कुठली नस दाबायची आणि कुठली बाहेर काढायची हे त्यांना चांगले माहिती असले तरीही ते सध्या कारागृहात असून तेही मतदान केंद्रावर मतदानाला आले होते. त्यांच्या लेकीने आणि पत्नीने ही लढाई लढली आहे. त्यामुळे येथेही नेमका कसा निकाल लागेल हे उद्याच पहायला मिळणार आहे. तसेच माणमध्ये एकमेंकाना पाण्यात पाहणारे दोन सख्खे भाऊ सुरुवातीला रिंगणात होते परंतु अचानक आमदार जयकुमार गोरेंनी माघार घेतल्याने शेखर गोरे विरुद्ध सहकार पॅनेलचे मनोज पोळ यांच्यात लढत झाली असून शेखर गोरे यांना जर जयकुमार गोरे यांनी मदत केली असली तर दुसऱया बाजूला गोरे हे माळी असल्याने त्यांच्या विरोधात मराठा समाजाचे मतदार एकवटले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे निकाल काय लागेल याकडे लक्ष लागून राहिले.