मृत शेतकऱयाच्या परिवाराला 45 लाख रुपये, एकाला नोकरी, विरोधकांचे आंदोलन
लखनौ, नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्रीय मंत्र्यांच्या पुत्राच्या ताफ्यातील कारने धडक दिल्याने चार आंदोलक शेतकऱयांचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे हिंसाचार भडकलेल्या लखिमपूर खेरीत सरकार आणि शेतकरी यांच्यात समझोता झाला आहे. मृत शेतकऱयांच्या परिवाराला प्रत्येकी 45 लाख रुपये आणि परिवारातील एकाला सरकारी नोकरी देण्यात येणार आहे. तसेच सर्व दोषींना आठ दिवसात अटक करण्यात येईल, असे उत्तर प्रदेश सरकार आणि शेतकरी यांनी ठरविले आहे, अशी माहिती देण्यात आली.
समझोत्याची माहिती उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी दिली. या प्रकरणाची चौकशी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकडून केली जाईल. शेतकऱयांच्या सांगण्यानुसार दोषींविरोधात तक्रार सादर केली जाईल, असेही समझोत्यात निर्धारित करण्यात आले आहे.
मंत्र्यांच्या मुलावर हत्येचा गुन्हा
केंद्रीय मंत्री अजय मिश्र यांच्या मुलावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यासह अन्य 14 लोकांवरही हाच गुन्हा दाखल करण्यात आला असून कट रचण्याचे प्रकरण दाखल करण्यात आले. हे गुन्हे बहराईच येथील निवासी जगजीत सिंग यांच्या तक्रारीवरुन दाखल करण्यात आले आहेत.
लखनौत पोलिसांची गाडी जाळली
चार शेतकऱयांच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या शेतकऱयांच्या जमावाने लखनौत पोलिसांच्या एका जीपला आग लावली. सुदैवाने या जीपमध्ये कोणीही नव्हते. हा प्रकार उत्तर प्रदेश सरकार आणि शेतकरी यांच्यात समझोता होण्यापूर्वी घडला. समझोता झाल्यानंतर मात्र लखिमपूर खेरी आणि आसपासच्या परिसरात शांतता निर्माण झाली आहे. तथापि, काही ठिकाणी निदर्शने चालूच आहेत.
अखिलेश यादव यांचे धरणे
रविवारी काँगेस नेत्या प्रियांका गांधी यांनी लखिमपूर खेरी येथे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना अडविण्यात येऊन बंदीवासात ठेवण्यात आले. सोमवारी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनाही तेथे जाण्यास मज्जाव करण्यात आला. याच्या निषेधार्थ त्यांनी लखनौ येथे धरणे धरले. समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एका पोलीस अधिकाऱयाला मारहाण केली.
गांधींचे सफाई अभियान
स्थानबद्ध असलेल्या प्रियांका गांधी यांनी त्यांना ठेवलेल्या खोलीची झाडू मारुन सफाई केली. हा व्हिडीओ प्रसारित करण्यात आला. उत्तर प्रदेशात असेच राजकीय सफाई अभियान त्यांच्या नेतृत्वात हाती घेण्यात येईल, असे काही काँगेस नेत्यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी प्रियांका गांधींशी योग्य वर्तणूक न केल्याचा आणि त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोपही काही काँगेस नेत्यांनी केला.
पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना मज्जाव
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह लखिमपूर खेरी येथे जाण्याची योजना आखली होती. तथापि, त्यांची विमाने लखनौत उतरु देऊ नयेत असे आदेश प्रशासनाने दिल्याने त्यांना दौरा रद्द करावा लागला. काँगेसने प्रशासनाचा यासंदर्भात निषेध केला आहे.
इंटरनेट सेवा बंद
लखिमपूर खेरी आणि आसपासच्या जिल्हय़ांमध्ये सोमवारीही इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती. अफवा पसरु नयेत आणि लोकांना भडकविण्याचा प्रयत्न होऊ नये, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले होते, असे स्पष्ट करण्यात आले. आवश्यकता भासल्यास मंगळवारीही इंटरनेट बंद ठेवण्यात येणार आहे. हरदोई, बाराबंकी, लखनौ ग्रामीण आणि लखिमपूर खेरी या जिल्हय़ांमध्ये पीएसी नियुक्त करण्यात आली आहे. बहुतेक भागांमध्ये शांतता आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा शेतकऱयांना प्रश्न
केंद्र सरकारच्या तिन्ही नव्या कृषी कायद्यांना न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तरीही शेतकरी आंदोलन का करीत आहेत, असा प्रश्न सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने शेतकऱयांच्या नेत्यांना केला. आंदोलक नेते आंदोलन शांततापूर्ण पद्धतीने करण्याचा दावा करतात. मात्र अशाप्रकारच्या घटना घडतात तेव्हा जबाबदारी घेण्यास कोणीही पुढे येत नाही, अशीही टिप्पणी न्यायालयाने केली. सरकारच्या वतीने ऍटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी युक्तिवाद केला. लखिमपूर खेरीसारख्या घटना घडू द्यायच्या नसतील तर शेतकरी आंदोलनावर त्वरित बंदी घातली पाहिजे, असे मत त्यांनी न्यायालयासमोर मांडले.
मंत्रीपुत्रासंबंधी काही प्रश्न
केंद्रीय मंत्री अजय मिश्र यांच्या पुत्राच्या कारताफ्यातील एका कारने शेतकऱयांना धडक दिल्याने चार शेतकरी मृत झाल्याची घटना रविवारी घडली होती. मात्र, घटनास्थळी आपला पुत्र उपस्थित नव्हता, असा दावा अजय मिश्र यांनी केला आहे. तसेच जे घडले तो केवळ अपघात होता आणि त्यामागे कोणतेही कारस्थान नव्हते, असेही त्यांचे म्हणणे आहे. शेतकऱयांनी कारच्या चालकाला बेदम मारहाण करुन त्याची हत्या केली. भाजपच्या तीन कार्यकर्त्यांचीही हत्या करण्यात आली. त्या दोषींवरही कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
दिवसभरात...
ड प्रियांका गांधी, अखिलेश यादव यांचे सरकारविरोधात आंदोलन
ड लखिमपूर खेरी आणि आसपासच्या प्रदेशात कडेकोट बंदोबस्त
ड या भागांमध्ये दोन दिवस इंटरनेट बंद ठेवण्याचा घेतला निर्णय