उत्तर प्रदेश सरकारच्या एसआयटीचा निष्कर्ष
लखनौ / वृत्तसंस्था
ऑक्टोबरमध्ये उत्तर प्रदेशात घडलेले लखीमपूर खेरी प्रकरण पूर्वनियोजित आहे, असा निष्कर्ष या प्रकरणाचा तपास करणाऱया विशेष तपास दलाने (एसआयटी) काढला आहे. 3 ऑक्टोबरला येथे कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱया शेतकऱयांवर कार घालून 3 शेतकऱयांचा बळी घेण्यात आला होता. त्यानंतर झालेल्या हिंसाचारात एका पत्रकारासह आणखी दोनजण प्राणास मुकले होते.
या प्रकरणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा पुत्र अशिश याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर शेतकऱयांच्या हत्या करण्याचा आरोप आता ठेवण्यात आला आहे. प्रथम त्याच्या विरुद्ध सादर करण्यात आलेल्या आरोपपत्रात आता आणखी काही आरोप वाढविण्यात आले आहेत, अशी माहिती देण्यात आली.
नवे आरोप
विशेष तपास दलाचे अधिकारी विद्याराम दिवाकर यांनी अशिश मिश्रा याच्यावरील आरोपपत्रात आणखी आरोप समाविष्ट करण्याची विनंती न्यायालयाला केली आहे. भारतीय दंड विधान आणि अनुच्छेद 307 (हत्येचा प्रयत्न), अनुच्छेद 326 (हेतुपुरस्सर गंभीर जखम करणे) हे दोन आरोप नव्याने लावण्यात आले आहेत. पूर्वींच्या आरोपपत्रातील काही सौम्य आरोप वगळण्याचीही विनंती करण्यात आली आहे. सार्वजनिक मार्गावर बेभान ड्रायव्हिंग आणि निष्काळजीपणाने मृत्यूला कारणीभूत होणे हे दोन आरोप वगळण्याची विनंती करण्यात आली आहे.
अन्य काहींना अटक
तपास दलाने आतापर्यंत या प्रकरणी अशिश मिश्रासह लवकुश, अशिश पांडे, शेखर भारती, अंकित दास, लतीफ, शिशुपाल, नंदन सिंग, सत्यम त्रिपाठी, सुमित जयस्वाल, धर्मेंद्र बंजारा, रिंकू राणा आणि उल्हास त्रिवेदी यांनी अटक केली आहे. या सर्वांना लखीमपूर खेरीच्या कारागृहात डांबण्यात आले आहे.
जामीनासाठी प्रयत्न
आरोपींनी या प्रकरणात जामिन मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ पीठासमोर जामिन अर्ज सादर केला आहे. न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला दोन आठवडय़ांमध्ये या अर्जासंबंधी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला आहे. राज्य सरकारचे अतिरिक्त वकील विनोद शाही यांनी युक्तीवाद केला. त्यांनी उच्च न्यायालयाला आतापर्यंत झालेल्या तपासाची माहिती दिली असून जमिन अर्जाला विरोध दर्शविला आहे.
विरोधकांचे आरोप
लखीमपूर खेरी प्रकरण पूर्वनियोजित होते, असा अहवाल आल्यामुळे आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी तृणमूल काँगेस नेत्या ममता बॅनर्जी यांनी केली आहे. तर आता ‘पंतप्रधान मोदी यांच्यावर पुन्हा क्षमायाचना करण्याची वेळ आली आहे, अशी टिप्पणी राहुल गांधींनी केली.