ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यातील टिकोनिया येथे रविवारी शेतकरी आंदोलनादरम्यान हिंसाचार झाला. या हिंसाचारात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 4 शेतकरी, 3 भाजप कार्यकर्ते, एक भाजप नेत्याचा चालक आणि एका पत्रकाराचा समावेश आहे.
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य रविवारी एका कुश्तीच्या कार्यक्रमासाठी लखीमपूरमध्ये येणार होते. मौर्य यांच्याविरोधात निर्दशने करण्यासाठी कृषी कायदेविरोधी शेतकरी आंदोलक जमले होते. त्याचवेळी मौर्य यांच्या स्वागतासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलासह अन्य कार्यकर्ते तीन गाडय़ांमधून आले होते. आंदोलनकर्त्या शेतकऱयांसोबत त्यांची बाचाबाची झाली. त्यानंतर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या अंगावर दोन कार घुसवण्यात आल्या. या गाडय़ांखाली चिरडून 9 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, लखीमपूरमधील शेतकऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र झाले असून, जिह्यातील परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून कलम 144 लागू करण्यात आले आहे. तसेच महत्त्वाच्या नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.