ऑनलाईन टीम/तरुण भारत
लखीमपूर खिरीमधील शेतकरी हत्याकांड हा मंत्रिपुत्राचा पूर्वनियोजित कटच होता, असा धक्कादायक दावा एसआयटीने केला आहे. ३ आॅक्टोबर रोजी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राने कटकारस्थान रचून ४ शेतकऱ्यांना हेतूपुरस्सर गाडीखाली चिरडले. ही घटना निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे घडली असे नव्हे, तर हे पूर्वनियोजित हत्याकांड होते, असे एसआयटीच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
एसआयटीने दोन महिन्यांनंतर एफआयआरमधील दोन भादंवि कलमांमध्येही बदल केला आहे. आता हत्येचे कलम लावण्यात आले. न्यायालयाने त्यास मंजुरी दिली. एफआयआरमध्ये आशिष मिश्रा मुख्य आरोपी आहे. मंगळवारी सर्व आरोपींना न्यायालयात हजर करून नव्या कलमांनुसार वॉरंट जारी करीत तुरुंगात रवानगी करण्यात आली.