ऑनलाईन टीम / लखनऊ :
लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचारात आंदोलक शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या थार जीपमध्ये बसलेल्या सुमित जयस्वालसह अन्य तिघांना उत्तरप्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. नंदन, शिशुपाल आणि सत्यप्रकाश अशी या तिघांची नावे आहेत. सत्यप्रकाशकडून परवानाधारक पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
सुमित जयस्वाल यानेच शेतकऱ्यांविरोधात खुनाचा एफआयआरही दाखल केला होता. तो केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आणि या हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष मिश्राचा निकटवर्तीय होता. शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या जीपमध्ये सुमित होता. एका व्हिडिओमध्ये या घटनेनंतर तो पळून जाताना दिसत आहे. याप्रकरणात यापूर्वीच आशिष मिश्रा, माजी केंद्रीय मंत्री अखिलेश दास यांचा भाचा अंकित दास, लतीफ उर्फ काळे, शेखर आणि आशिष पांडे यांना अटक केली आहे.