ऑनलाईन टीम
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी भागात शेतकऱ्यांनी केलेल्या कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनाला हिंसक वळण लागले. तर, केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याचा आरोप होत असून, या हिंसाचारात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे लखीमपूरमध्ये तणावाचे वातावरण आहे. यानंतर उत्तर प्रदेश सरकारने या आंदोलक शेतकऱ्यांशी संवाद साधत मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी योगी सरकारने मोठी घोषणा केली.
हिंसाचारात मारल्या गेलेल्या चार शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना ४५ लाख रुपयांची भरपाई देण्याचा निर्णय योगी सरकारने घेतला आहे. तर, जखमींना १० लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तसेच पीडितांच्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरी दिली जाईल, अशी घोषणा योगी सरकारने केली आहे.
उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, “रविवारी लखीमपूर खेरीमध्ये मरण पावलेल्या ४ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना सरकार ४५ लाख रुपये आणि सरकारी नोकरी देईल. तर, जखमींना १० लाख रुपये दिले जातील. शिवाय या हिंसा प्रकरणाची न्यायालयीन चौकशीही केली जाईल. शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार एफआयआर नोंदवला जाईल आणि उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश या प्रकरणाची चौकशी करतील. सध्या जिल्ह्यात कलम १४४ लागू असल्याने राजकीय पक्षांच्या नेत्यांना जिल्ह्यात येण्याची परवानगी नाही. केवळ शेतकरी संघटनांचे नेते जिल्ह्यात येऊ शकतात असे सांगितले.
लखीमपूर हिंसाचारात एकूण नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये चार शेतकऱ्यांचा समावेश आहे. तर, मारले गेलेले इतर चार जण हे भाजपा कार्यकर्ते असल्याचं समोर आलंय. दरम्यान याप्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.