लोकसभेचे कामकाज स्थगित : मंत्र्याच्या राजीनाम्याची काँग्रेसची मागणी
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
संसदेत बुधवारी लखीमपूर खीरी हिंसेप्रकरणी पुन्हा गोंधळ झाला. लोकसभेत विरोधी पक्षांचे खासदार केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचे पुत्र आशीष याच्या विरोधातील एसआयटी अहवालानंतर आक्रमक दिसून आले. गोंधळ वाढताना पाहून लोकसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले.
एसआयटीच्या अहवालानंतर हा मुद्दा सभागृहात उपस्थित करू इच्छितो. यावर किमान संसदेत तरी चर्चा होणे अपेक्षित आहे, पण चर्चेची अनुमती मिळत नाही. मंत्र्यांना (अजय मिश्रा टेनी) राजीनामा द्यावाच लागेल, असे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी म्हटले.
स्थगत प्रस्तावाची नोटीस
लखीमपूर खीरी हिंसेवरून राहुल गांधी यांनी लोकसभेत स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली आहे. सरकारने अजय मिश्रा यांना मंत्रिपदावरून काढून टाकावे अशी मागणी करणार आहोत असे लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी म्हणाले. तृणमूल खासदार सुष्मिता देव यांनीही लखीमपूर खीरी हिंसेप्रकरणी राज्यसभेत चर्चेच्या मागणीवरून नोटीस दिली आहे. बुधवारपासून उत्तरप्रदेश विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून तेथे सप, बसप आणि काँग्रेसच्या सदस्यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे.
मुख्य आरोपी आशीष मिश्र समवेत सर्व 13 आरोपींवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 3 ऑक्टोबर रोजी झालेली हिंसा ही दुर्घटनेतून नव्हे तर हत्येचा कट रचण्यात आला होता असे एसआयटीने अहवालात म्हटले आहे.